बीड जिल्ह्यातील परळी येथे एका तरुणाचा शासकीय आयटीआय (ITI) महाविद्यालयाच्या परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आकाश राम खाटिक याच्यावर POCSO आणि BNS अंतर्गत गुन्हे दाखल; पोलीस शोध घेत असतानाच झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
बीड जिल्ह्यातील परळी येथे एका तरुणाचा शासकीय आयटीआय (ITI) महाविद्यालयाच्या परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृताची ओळख आकाश राम खाटिक (रा. वडगाव दाभाडी, ता. परळी) अशी झाली असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी पोक्सो (POCSO) कायद्यासह भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
घटनेची माहिती मिळताच परळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
प्रेमसंबंधातून वाद वाढल्याचा आरोप
माहितीनुसार, आकाश खाटिक याचे त्याच गावातील 17 वर्षे 11 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. मात्र या संबंधांना मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यांनी मुलीला आकाशशी संपर्क ठेवण्यास मनाई केली होती.
काही दिवसांपूर्वी आकाशने संबंधित मुलीला भेटून ती त्याच्याशी संवाद का साधत नाही, अशी विचारणा केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर झालेल्या वादातून त्याने विळ्याने हल्ला केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.
POCSO आणि BNS अंतर्गत गुन्हे
परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 366/2026 नुसार आकाश खाटिकविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 75(1), 76, 78, 127(2), 333, 351(2), 352 तसेच POCSO कायदा कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आकाश गावातून फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते.
आयटीआय परिसरात मृतदेह आढळला
पोलीस त्याचा शोध घेत असतानाच आज सकाळी परळी येथील शासकीय आयटीआय महाविद्यालयाच्या परिसरातील एका झाडाला आकाशचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर वडगाव दाभाडी तसेच परळी शहरात शोककळा पसरली आहे.
पोलीस कारवाईची भीती किंवा त्याच्यावरील आरोपांच्या मानसिक तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा होत असली तरी याबाबत अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.