Parbhani Mahayuti: परभणी-हिंगोलीत मतदानाच्या दिवशी महायुतीच्या घटकांमधील मतभेदांचा गौप्यस्फोट झाला. सईद खान व राजेश विटेकर यांनी एकदिलाने मतदान करण्याचे आवाहन
सईद खान यांच्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी; आ . राजेश विटेकरांकडून एकदिलाने मतदानाचे आवाहन...!
परभणी (Parbhani Mahayuti) : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीत फूट पडेल, काही नेते वेगळी भूमिका घेतील आणि मतांचे विभाजन होईल अशा चर्चांना मागील दोन दिवसात घडलेल्या घडामोडींमधून उत्तर मिळताना दिसत आहे. आ .संतोष बांगर यांनी महायुतीच्या विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला. सोमवारी सोनपेठ येथे आ.राजेश विटेकर यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारामागे प्रामाणीकपणे एकजुटीने उभे राहण्याचे केलेले आवाहन यातून महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणताही संभ्रम नसून सईद खान यांच्या विजयासाठी सर्व यंत्रणा एकदिलाने कामाला लागली असल्याचे सिग्नल मिळत आहेत.
कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी मंगळवार १६ जुन रोजी माध्यमांशी बोलताना ही निवडणूक प्रतिष्ठेची नसल्याचे म्हणत महायुतीच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचा दावा केला.
भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही घटक पक्ष एकदिलाने मैदानात उतरले आहेत. आमच्याकडे केवळ कागदावरील आकडे नसून प्रत्यक्ष मतदारांचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. विरोधकांकडे आकडेमोड असली तरी अनेक स्थानिक प्रतिनिधी प्रत्यक्षात महायुतीसोबत आहेत असा गौप्यस्फोट ही त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंवादाचाही उल्लेख करत बांगर म्हणाले की तिथे उमेदवारांपेक्षाही मतांचे विभाजन अधिक चर्चेत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुतांश सदस्य महायुतीच्या संपर्कात असून मतदानाच्या दिवशी त्याचे स्पष्ट चित्र दिसून येईल.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ . राजेश विटेकर वेगळी भूमिका घेऊ शकतात, अशा राजकीय चर्चा रंगवल्या जात होत्या. मात्र प्रत्यक्षात झालेल्या बैठका आणि विटेकर यांनी केलेली वक्तव्ये या चर्चांना छेद देणारी ठरत आहेत. सोनपेठ येथे सोमवार १५ जुन रोजी महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विटेकर यांनी सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांना प्रामाणिकपणे महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले.
आपल्यातील सर्व मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवले आहेत. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. पुढील काही दिवसांत अनेक प्रकारचे प्रयत्न होतील, मात्र प्रत्येकाने प्रामाणिकपणे महायुतीच्या उमेदवाराचे काम करायचे आहे असे आवाहन विटेकर यांनी बैठकीत केले. मतदान प्रक्रियेबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करत प्रत्येक मत योग्य पद्धतीने महायुतीच्या उमेदवाराच्या पारड्यात पडावे यासाठी सूचना दिल्या.
राजकीय जाणकारांच्या मते हिंगोलीत आ . संतोष बांगर यांचा आक्रमक आत्मविश्वास आणि परभणीत आ . राजेश विटेकर यांची पारदर्शक भूमिका या दोन घडामोडी महायुतीसाठी अत्यंत सकारात्मक मानल्या जात आहेत. विशेष म्हणजे आ.विटेकर यांच्याबाबत पसरविण्यात आलेल्या अफवांना त्यांच्या प्रत्यक्ष बैठका आणि मतदारांना केलेले आवाहन यामुळे पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे.