Parbhani-Jintur Highway: परभणीत जिंतूरसाठी उड्डाणपुल व डब्बा बोगद्याचे काम सुरू आहे, परंतु सध्यातील स्थितीमुळे वाहन धारकांना एक किलोमीटरचा वळसा घालावा लागतो.
परभणी-जिंतूर महामार्गावर वाहनधारकांची अडचण; कंत्राटदार, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
परभणी (Parbhani-Jintur Highway) : जिंतूर या रोडवर बायपास रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मुख्य रस्त्याला ओलांडण्याकरीता उड्डाणपुल बांधला जात आहे. उड्डाणपुलाच्या खाली दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी सज्ज आहेत. सद्यस्थितीत हे बोगदे बंद असल्याने वाहन धारकांना एक किलोमिटरचा वळसा घालून रस्ता ओलांडावा लागत आहेत.
परभणी शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता शहरासाठी बायपास रस्ता बनविण्यात आला आहे. पाथरी रोड ते जिंतूर रोड या मार्गे सदर बायपास वसमत रोडवर जुळणार आहे. परभणी - जिंतूर हा मुख्य रस्ता ओलांडण्यासाठी उड्डाणपुल बनविण्यात आला आहे. वाहतुकीला अडचण होऊ नये यासाठी उड्डाणपुलाखाली बोगदे करण्यात आले आहेत. या बोगद्याच्या कामासाठी सदर मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती. परभणीतून जिंतूरकडे जाताना वाहनधारकांना एक किमीचा वळसा मारावा लागत होता. सध्या हे बोगदे तयार आहेत, मात्र वाहतुकीला खुले न करण्यात आल्याने वाहनधारकांची मोठी अडचण होत आहे. उड्डाणपुलाखालील बोगदे वाहतुकीसाठी खुले केल्यास इंधनासह मोठ्या प्रमाणात वेळेचीही बचत होईल.
इंधन, वेळेचा अपव्यय
या रस्त्यावरुन जाताना दररोज हजारो वाहनांना एक किमीचा वळसा मारुन रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे हजारो लिटर इंधनासह वेळेचाही अपव्यय होत आहे. याकडे प्रशासन, कंत्राटदार तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांचे लक्ष गेलेले नाही. रस्त्यावरुन ये - जा करणारे वाहनधारकही गुपचुप वळसा मारुन रस्ता ओलांडत आहेत.