Breaking News
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला
  • कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस
  • अकोल्यात भरधाव ट्रकचा धिंगाणा तर 8 ते 10 वाहनांसह महागड्या कारचे नुकसान
  • पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
  • बारामती तालुक्यातील पणदरे येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत बँक ऑफ इंडिया चे एटीएम फोडून दहा लाखांहून अधिक रक्कम लंपास केली
  • MPSC पेपरफुटीच्या निषेधार्थ अकोल्यात युवक काँग्रेसचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन..
  • जल जीवन मिशनच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
  • नालासोपाऱ्याच्या कळंब येथील तुळशी रिसॉर्टमध्ये हवेत गोळीबार
  • युवा हेच आपल्याला अभिनेता बनवतात... कंगना राणावतने चुकीचे वक्तव्य केले असेल, तर ही शरमेची बाब : अभिनेता सोनू सूद

होम > आपले शहर > विदर्भ > अमरावती

Open Pit

अमरावतीत जल जीवन मिशनच्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजीपणावर ग्रामस्थांचा संताप

जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावात जल जीवन मिशनच्या कामादरम्यान खोदलेल्या खड्ड्यात पडून अवघ्या ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.


अमरावतीत जल जीवन मिशनच्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू निष्काळजीपणावर ग्रामस्थांचा संताप

चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावातील दुर्घटना; सूचना फलक नसल्याचा आरोप, संबंधितांवर कारवाईची मागणी

अमरावती : जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावात जल जीवन मिशनच्या कामादरम्यान खोदलेल्या खड्ड्यात पडून अवघ्या ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संबंधित ठेकेदार आणि यंत्रणेच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मृत चिमुकलीचे नाव नायरा संजू बुसुम असे असून, कोरडा गावात जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात ती पडल्याची माहिती आहे. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले होते. त्याचदरम्यान खेळत असताना नायरा त्या खड्ड्यात पडली आणि तिचा मृत्यू झाला.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी काम सुरू होते त्या परिसरात काम सुरू असल्याची कोणतीही सूचना, इशारा फलक किंवा सुरक्षा व्यवस्था नव्हती. त्यामुळे ही दुर्घटना टाळता आली असती, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेमुळे सरकारी कामांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ग्रामीण भागात घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाची जल जीवन मिशन योजना राबवली जात आहे. मात्र, अशा कामांदरम्यान आवश्यक सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, याकडे या घटनेने लक्ष वेधले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईत मुसळधार पावसादरम्यान उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या घटनेतही योग्य सूचना फलक नसल्याचा मुद्दा पुढे आला होता. आता अमरावतीतील कोरडा गावातील दुर्घटनेनंतर सार्वजनिक कामांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन कितपत केले जाते, याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Related to this topic: