खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या या निर्णयामुळे हिंगोली शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
"हिंगोलीच्या विकासासाठी घेतलेला योग्य निर्णय" असा फलकावरील मजकूर ठरला लक्षवेधी
हिंगोली (Nagesh Patil Ashtikar) : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेशराव पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या या निर्णयामुळे हिंगोली शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
खासदार आष्टीकर यांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश करताच हिंगोली शहरात शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. महाराजा अग्रसेन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक यांसह शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि मुख्य रस्त्यांवर खासदार आष्टीकर यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
"हिंगोलीच्या विकासासाठी घेतलेला योग्य निर्णय" असा मजकूर या फलकांवर झळकत असून शिंदे सेनेने आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून शहरात ठिकठिकाणी जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतरामुळे संतप्त झालेल्या उबाठा गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी तीव्र निषेध नोंदवला.
"पक्षाने संधी दिली, मतदारांनी निवडून दिले आणि आता त्यांच्याशीच गद्दारी केली," असा आरोप करत उबाठा सेनेच्या स्थानिक नेत्यांनी आपला संताप व्यक्त केला. हिंगोली जिल्ह्यात दोन्ही गटांकडून सुरू असलेल्या पोस्टरबाजी आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील शिवसेना उबाठाच्या खासदारांनी पक्षाला रामराम ठोकून संसदेमध्ये वेगळा गट स्थापन केला. या खासदारांच्या गद्दारीबद्दल हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी तीव्र पडसाद उमटले होते. खासदार आष्टीकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्या गद्दारीबद्दल शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली होती.