मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा प्रतिबंधात्मक निर्णय; आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा
मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 23 जुलै 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून 6 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबईत भारतीय दंड प्रक्रिया संहितेअंतर्गत कलम 144 लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही सार्वजनिक शांतता बिघडण्याची, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची तसेच सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्या गोष्टींवर बंदी?
जमावबंदीच्या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई असेल. तसेच कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नसेल. मिरवणुकांदरम्यान लाऊडस्पीकर, विविध वाद्ये, बँड तसेच फटाके वापरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
कोणत्या गोष्टींना सूट?
या आदेशामुळे सर्वच उपक्रमांवर निर्बंध लागू होणार नाहीत. विवाह समारंभांवर कोणतीही बंदी नसणार आहे. अंत्यसंस्कार सभा तसेच स्मशानभूमी किंवा दफनभूमीकडे जाणाऱ्या अंत्ययात्रांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे.
याशिवाय कंपन्या, क्लब, सहकारी संस्था तसेच इतर संघटनांच्या कायदेशीर बैठका नियमितपणे घेता येणार आहेत. सामाजिक संस्था, सोसायट्या, क्लब आणि सहकारी संस्थांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित बैठकींवरही कोणतेही निर्बंध नसतील.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, न्यायालये, दुकाने, कारखाने आणि नियमित व्यावसायिक व्यवहार पूर्ववत सुरू राहतील. तसेच विभागीय पोलिस उपआयुक्तांची पूर्वपरवानगी घेतलेल्या संमेलने आणि मिरवणुकांनाही या आदेशातून सूट देण्यात आली आहे.