Latur Bus Accident: लातूरहून निलंग्याकडे निघालेल्या बसचा लातूर तालुक्यातील पेठ नजीक मोठा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस किड्स इन्फो पार्क या शाळेच्या स्कूलबस वर इतकी जोरात आढळली
लातूर (Latur Bus Accident) : लातूरहून निलंग्याकडे निघालेल्या बसचा लातूर तालुक्यातील पेठ नजीक मोठा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस किड्स इन्फो पार्क या शाळेच्या स्कूलबस वर इतकी जोरात आढळली की स्कूलबसला धडक देऊन ही बस राष्ट्रीय महामार्गापासून शंभर फुटावर गेली. या अपघातात दोन्ही बसचे नुकसान झाले असून एसटी बस मधील प्रवासी जखमी झाले. सुदैवाने स्कूल बस रिकामी उभी असल्याने मोठा अनर्थ टळला. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूरहुन आषाढी यात्रेचे वारकरी घेऊन निलंगा आगाराची बस लातूरमध्ये आली. निलंगा आगाराची एमएच-२० बीएल-२५७० क्रमांकाची एसटी बस दुपारी सुमारे दीड वाजता लातूर बसस्थानकातून औसाकडे निघाली होती. पेठ परिसरातील किड्स शाळेजवळ बस पोहोचताच बसमधील एका प्रवाशाने अचानक चालकाच्या पाठीमागे जाऊन स्टेअरिंगला हात घालत ते वळविल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी व बसमधील प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन धडकली.
या (Latur Bus Accident) अपघातात एमएच-२६ एन-९१४३ व एमएच-२५ टी-०५८६ क्रमांकाच्या दोन्ही स्कूलबसचे मोठे नुकसान झाले. एसटी बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातात एसटी बस मधील सर्व प्रवासी जखमी झाले असून त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातस्थळी मिळालेल्या माहितीवरून एसटी बस मध्ये असलेल्या एका प्रवाशाबरोबर किरकोळ वाद सुरू झाल्यानंतर या प्रवाशांनी बस चालकासमोर येत स्टेरिंगवर स्वतःला झोकून व स्टेअरिंग ओढले. यामुळे बसचालकाचे नियंत्रण सुटून बस महामार्गालगत उभ्या असलेल्या किड्स इन्फो पार्क स्कूलच्या बस वर आदळली. अपघातानंतर लागलीच आजूबाजूच्या लोकांनी मदत कार्य करीत बसमधील प्रवाशांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यास मदत केली.
महामार्ग प्राधिकरण व महामार्ग पोलिसांची चूक
नागपूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर पेठ नजीक किड्स इन्फो पार्क शाळा आहे. या शाळे शेजारी या शाळेच्या बसेस महामार्ग लगत उभ्या केल्या जातात. दररोज उभ्या राहणाऱ्या या बस कडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तसेच राष्ट्रीय महामार्ग पोलिसांचे सर्रास दुर्लक्ष झाले आहे. सोमवारी झालेल्या अपघाता वेळी स्कूल बस मध्ये विद्यार्थी नव्हते, ही जमेची बाजू असली तरी या महामार्गालगत स्कूल बस उभ्या केल्या जात असल्याने रस्ते सुरक्षितता व वाहन सुरक्षितता धोक्यात आली आहे. महामार्ग प्राधिकरण, महामार्ग पोलीस आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी याची नोंद घेत तात्काळ बंदोबस्त करण्याची गरज आहे.
सुदैवाने जीवितहानी टळली...
प्रत्यक्षदर्शींच्या मते, बसने दोन स्कूलबसना धडक दिल्यानंतरही चालकाने धैर्य न गमावता बस सुमारे शंभर फूट पुढे मोकळ्या जागेत नेऊन थांबविली. त्यामुळे बस अनियंत्रित होऊन आणखी मोठा अपघात होण्याची शक्यता टळली. त्या वेळी स्कूलबस विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या. सुदैवाने विद्यार्थ्यांची मोठी गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. या अपघातामुळे लातूर–औसा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण, संबंधित प्रवाशाची भूमिका आणि त्याच्याविरुद्ध कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.