परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला.
डॉ. विवेक नावंदर दुसऱ्या क्रमांकावर; सईद खान यांना २४२ मते
परभणी (Legislative Council Election) : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. १८ जून रोजी पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांनी २४२ मते मिळवत विजय संपादन केला. त्यांनी महाविकास आघाडी (उबाठा) समर्थित उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांचा पराभव केला.
निकालानुसार, डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते, तर अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांना ५६ मते मिळाली. या निवडणुकीत प्रथमच तब्बल ८ मते बाद ठरली.
या निवडणुकीसाठी एकूण ४६६ मतदारांपैकी ४६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी सईद खान यांनी २४२ मते मिळवत विजय मिळविला. मतमोजणी सोमवारी, २२ जून रोजी पार पडली.
परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडे अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा असूनही, ही जागा शिवसेनेच्या वाट्याची असल्याने ती शिवसेनेकडेच राहणार असल्याचे महायुतीकडून स्पष्ट करण्यात आले होते.
शिवसेनेकडून माजी आमदार विप्लब बाजोरिया आणि अभिमन्यू खोतकर यांनीही उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असताना ऐनवेळी शिवसेनेच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
मतमोजणीनंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सईद खान यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, विशाल कदम, आसेफ खान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सईद खान यांच्या विजयाची घोषणा होताच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.
सुशील देशमुखांच्या उमेदवारीमुळे मतांचे विभाजन
परभणी-हिंगोली जिल्ह्यात महायुतीचे पारडे सुरुवातीपासूनच जड मानले जात होते. महायुतीकडे सुमारे ३३४ मतांचा पाठिंबा, तर महाविकास आघाडीकडे १०२ मते असल्याचे गणित होते. त्यामुळे सईद खान यांचा विजय तुलनेने सोपा मानला जात होता.
मात्र महाविकास आघाडीकडून डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली. विशेषतः सुशील देशमुख यांच्या उमेदवारीमुळे विरोधी मतांचे विभाजन झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.