Korchi Nagar Panchayat: तालुक्यातील कोरची नगरपंचायतीत सध्या मोठी राजकीय उलथापालथ झाली असून सत्ताधारी पक्षाचे बहुमत संपुष्टात आले आहे. 17 सदस्यसंख्या असलेल्या नगरपंचायतीत बहुमतासाठी 9 सदस्यांची गरज
कोरची (Korchi Nagar Panchayat) : तालुक्यातील कोरची नगरपंचायतीत सध्या मोठी राजकीय उलथापालथ झाली असून सत्ताधारी पक्षाचे बहुमत संपुष्टात आले आहे. 17 सदस्यसंख्या असलेल्या नगरपंचायतीत बहुमतासाठी 9 सदस्यांची गरज असते. निवडणुकीनंतर सत्ताधारी पक्षाकडे नेमके 9 सदस्य होते, मात्र दोन महत्त्वाच्या घडामोडींमुळे हे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील नगरसेविका भगवती सोनार यांनी शासकीय नोकरी लागल्यामुळे पदाचा राजीनामा दिला, तर प्रभाग क्रमांक 15 चे नगरसेवक दिलीप शामलाल मडावी यांचे नुकतेच निधन झाले. या दोन्ही जागा सत्ताधारी पक्षाच्या असल्याने त्यांच्या सदस्यसंख्येत थेट घट झाली आहे.
सध्या नगरपंचायतीत 15 सदस्य कार्यरत असून सत्ताधारी पक्षाकडे फक्त 7 सदस्य उरले आहेत, तर विरोधी पक्षाकडे 8 सदस्य आहेत. त्यामुळे नगरपंचायतीत सत्तेचा समतोल विरोधकांच्या बाजूने झुकला आहे. यामुळे आता कोणताही ठराव मंजूर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षाच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. विशेषतः अर्थसंकल्प, विकासकामे आणि धोरणात्मक निर्णयांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियम 1965 नुसार रिक्त झालेल्या प्रभाग 2 व 15 साठी राज्य निवडणूक आयोगाला 6 महिन्यांच्या आत पोटनिवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवर होणाऱ्या निवडणुका आता कोरचीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर, आदिवासी व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या कोरची तालुक्यातील विकासकामांवर या राजकीय अस्थिरतेचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.