पुणे जिल्हा आणि पश्चिम घाटमाथा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे.
खडकवासला धरण 32 टक्के भरले; पुढील 24 तासांत 80 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट
पुणे जिल्हा आणि पश्चिम घाटमाथा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. अतिवृष्टीमुळे धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढत असून, नदीपात्रांमध्ये पाण्याचा प्रवाहही धोकादायक पातळीवर पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
पुण्याच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत मानले जाणारे खडकवासला धरण 6 जुलै रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत 32 टक्के क्षमतेने भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला जोरदार पाऊस कायम राहिल्यास पुढील 24 तासांत धरणातील पाणीसाठा 80 टक्के किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाचा वेग कायम राहिल्यास खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून कोणत्याही क्षणी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाने नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना तसेच सखल भागातील गावांना हाय अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे तसेच जनावरे आणि आवश्यक साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम इंद्रायणी नदीवरही झाला असून नदीने धोका पातळी ओलांडली आहे. इंद्रायणीचे पाणी भीमा नदीत मिसळत असल्याने दौंड बंधाऱ्यातून सध्या 27 हजार 847 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या वाढत्या प्रवाहामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीतही वेगाने वाढ होत आहे.
पूराचा धोका लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथके चोवीस तास परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, संभाव्य पूरस्थितीवर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना सुरू आहेत.
दुसरीकडे, मुसळधार पावसाचा फटका मुंबई–पुणे रेल्वे मार्गालाही बसला आहे. लोणावळा–कर्जत दक्षिण-पूर्व घाट विभागातील मंकी हिल आणि खंडाळा स्थानकांदरम्यान कि.मी. 121 ते 123 या परिसरात डोंगराची मोठी दरड कोसळल्याने रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात दगड, खडक आणि माती साचली आहे. परिणामी या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी, शेकडो कर्मचारी आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री घटनास्थळी दाखल झाली आहे. युद्धपातळीवर ढिगारा हटविण्याचे काम सुरू असले तरी घाट विभागातील सततचा मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे बचाव व दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. तरीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.