आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्लीत झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कन्हान : विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, त्यांच्या भविष्याच्या संरक्षणासाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्लीत झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाच्या समर्थनार्थ उपोषणावर बसलेले सोनम वांगचुक यांना २२ व्या दिवशी बळजबरीने उचलून नेल्याच्या घटनेचा तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व खासदारांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ कन्हान येथे सर्वपक्षीय भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.
मोर्चादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

शुक्रवार (दि. २४ जुलै) रोजी सायंकाळी ५ वाजता नाका क्रमांक ७ येथे सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते एकत्र आले. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे नैराश्यातून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना तसेच संसद भवन मोर्चादरम्यान पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली.
नागपूर–जबलपूर महामार्गावरून बॅनर आणि फलकांसह घोषणाबाजी करत मोर्चा तारसा रोड चौक, शहीद प्रकाश देशमुख चौक, शिवनगर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पोलीस स्टेशन चौक या मार्गाने काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव, माजी मंत्री राजेंद्र मुळक, नरेश बर्वे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई बर्वे, रिपब्लिकन भीमशक्तीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी लोकशाही मार्गाने जंतर-मंतर येथे न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. तसेच आंदोलन दडपण्यासाठी सरकार विद्यार्थ्यांशी संवाद न साधता पोलिसांचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात आला. पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर बसलेल्या काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदारांना पोलिसांनी बळजबरीने धक्काबुक्की करून ताब्यात घेतल्याचा निषेध व्यक्त करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
या सर्वपक्षीय मोर्चात माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव, माजी मंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई बर्वे, रिपब्लिकन भीमशक्तीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख सुत्तम मस्के, बीआरएसपीचे शांताराम जळते, प्रवीण सतदेवे, कन्हान महिला मंचाच्या अध्यक्षा रिताताई बर्वे, काँग्रेस तालुकाध्यक्ष दयाराम भोयर, कन्हान युथ फाऊंडेशनचे कॅप्टन सतीश बेलसरे तसेच काँग्रेस, शिवसेना (उबाठा), रिपब्लिकन भीमशक्ती, बीआरएसपी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.