तालुक्यातील मासरूळ येथील ह.भ.प. कालीदास महाराज देशमुख यांची चीनच्या तिबेट या स्वायत्त भागातील मानसरोवर कैलास पर्वत यात्रेसाठी निवड झाली आहे.
बुलडाणा : तालुक्यातील मासरूळ येथील ह.भ.प. कालीदास महाराज देशमुख यांची चीनच्या तिबेट या स्वायत्त भागातील मानसरोवर कैलास पर्वत यात्रेसाठी निवड झाली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी या यात्रेसाठी नोंदणी केली होती. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने त्यांची तसेच महाराष्ट्रातील अन्य तीन जणांची निवड करण्यात आली असून, दि. ५ जुलै रोजी दिल्ली येथील कैलास भवन येथून त्यांच्या यात्रेला प्रारंभ होणार आहे.
दि. ४ जुलै रोजी मासरूळ येथून ते यात्रेसाठी रवाना होत असताना त्यांना निरोप देण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परिसराचे भूषण ह.भ.प. देवेंद्र चैतन्य स्वामी (पाताळेश्वर संस्थान, अवघडराव सावंगी) तसेच गावातील श्री गजानन माऊली भक्त परिवार उपस्थित होता.
यात्रेला रवाना होण्यापूर्वी कालीदास महाराज यांनी गावातील श्री चक्रधर स्वामी मंदिर, हनुमान मंदिर, जगदंबा माता मंदिर, बाहेरील हनुमान मंदिर, गणपती मंदिर, गजानन महाराज मंदिर आणि काशी विश्वेश्वर मंदिरात जाऊन पूजन व पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर मातृ-पितृपूजन तसेच संतपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

मानसरोवर कैलास पर्वत हे ठिकाण भारत आणि नेपाळच्या सीमेलगत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ४,५५७ मीटर उंचीवर वसलेले आहे. या भागात ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी असते. कैलास पर्वत अर्थात मेरू पर्वत हे भगवान शिवशंकर यांचे निवासस्थान मानले जाते, तर मानसरोवर हा जगातील सर्वात गोड पाण्याचा तलाव म्हणून ओळखला जातो.
अशा पवित्र स्थळाच्या यात्रेची संधी लाभल्याने कालीदास महाराज देशमुख यांनी यात्रेपूर्वी श्री संत गजानन महाराज सेवा समितीच्या विश्वस्तांकडे वॉल कंपाउंडसाठी २५ हजार रुपयांची देणगी दिली. यापूर्वी त्यांनी या कामासाठी ५१ हजार रुपयांचा संकल्प केला होता. त्यापैकी २५ हजार रुपये जमा करण्यात आले असून उर्वरित रक्कम यात्रेनंतर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही गजानन महाराज मंदिरासाठी त्यांनी ५१ हजार रुपयांची देणगी दिली आहे.
मासरूळ ते शेगाव पायी दिंडी असो किंवा इतर कोणतेही धार्मिक कार्य, कालीदास महाराज देशमुख हे नेहमीच सक्रिय सहभाग घेत असून विविध आध्यात्मिक उपक्रमांमध्ये त्यांचे दातृत्व कायम राहिले आहे.
आध्यात्मिक पुण्याईचा लाभ – ह.भ.प. देवेंद्र चैतन्य स्वामी
ह.भ.प. देवेंद्र चैतन्य स्वामी म्हणाले, "तन-मन-धनापासून केलेल्या आध्यात्मिक कार्यामुळेच ह.भ.प. कालीदास महाराज यांच्या जीवनात हा योग आला आहे. मानसरोवर कैलास पर्वत यात्रा प्रत्येकाला सहज शक्य होत नाही. त्यासाठी पुण्याई लागते. कालीदास महाराज नेहमीच अध्यात्मिक कार्यात अग्रेसर असतात आणि त्याचाच हा एक भाग आहे."