राज्यात अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेला अधिक गती मिळाली असून, विविध ठिकाणी सातत्याने तपासण्या केल्या जात आहेत.
भेसळविरोधी मोहिमेला वेग; पटेल दूध डेअरीची अचानक तपासणी, प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लक्ष
जालना (Jalna Dairy Raid) : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेला अधिक गती मिळाली असून, विविध ठिकाणी सातत्याने तपासण्या केल्या जात आहेत. याच मोहिमेअंतर्गत जालना शहरातील दुखी नगर परिसरातील पटेल दूध डेअरीवर बुधवारी सायंकाळी अचानक छापा टाकण्यात आला.
तपासणीदरम्यान डेअरीमध्ये सुमारे एक हजार लिटर म्हशीचे दूध साठवून ठेवलेले आढळले. अधिकाऱ्यांनी नियमानुसार दुधाचे नमुने संकलित करून ते सील केले असून, हे नमुने पुढील रासायनिक विश्लेषणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील अन्न विश्लेषक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील प्रशासकीय कारवाई निश्चित केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत तसेच भेसळ रोखली जावी, या उद्देशाने राज्यभरात नियमित तपासण्या सुरू आहेत. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत वाढती जनजागृती लक्षात घेऊन या विभागाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
ही कारवाई सहायक आयुक्त नि. सु. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी तांबे, अन्न सुरक्षा अधिकारी अनुजा नगरारे आणि नमुना सहाय्यक धम्मदीप नरवडे यांच्या पथकाने पार पाडली. संपूर्ण तपासणी प्रक्रियेत सर्व नमुने नियमानुसार संकलित करून पुढील चाचणीसाठी पाठवण्यात आले.
दरम्यान, पटेल दूध डेअरीचे मालक अजीम पटेल यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांच्या डेअरीतील दूध नियमितपणे तपासणीसाठी घेतले जाते आणि आतापर्यंत सर्व अहवालांमध्ये दूध शुद्ध व दर्जेदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजची तपासणीही नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्राहकांना दिले जाणारे दूध स्वतःच्या म्हशींपासून मिळत असल्याने गुणवत्ता आणि शुद्धतेत कोणतीही तडजोड केली जात नसल्याचा दावाही त्यांनी केला.
सध्या या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष प्रयोगशाळेच्या अहवालावर अवलंबून असून, प्रशासन आणि डेअरी व्यवस्थापन दोघांचेही लक्ष या अहवालाकडे लागले आहे. दरम्यान, राज्यभरातील अशा कारवायांमुळे भेसळविरोधी मोहिमेची जोरदार चर्चा सुरू असून, या पावलांचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.