राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गीतांजली टॉकीज दुर्घटनेनंतर पुन्हा इमारतीचा धोका; जेसीबीच्या साहाय्याने धोकादायक भाग पाडला, नागपुरात २७८ इमारती धोकादायक
नागपूर (Itwari Building Collapse) : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी गीतांजली टॉकीज परिसरात इमारतीचा काही भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी इतवारी परिसरातील एका जीर्ण इमारतीचा काही भाग खचल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नागपूरमधील इतवारी हा कायम वर्दळीचा परिसर मानला जातो. अशा ठिकाणी इमारतीचा काही भाग खचल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, खचलेला भाग तत्काळ कोसळला नसल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि नागपूर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाहणीनंतर संबंधित इमारतीचा धोकादायक भाग जेसीबीच्या सहाय्याने नियंत्रित पद्धतीने पाडण्यात आला. संपूर्ण कारवाईदरम्यान आवश्यक सुरक्षेची खबरदारी घेण्यात आल्याने कोणतीही जीवित अथवा अन्य हानी झाली नाही. धोकादायक भाग हटवल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गीतांजली टॉकीजजवळ इमारतीचा काही भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. त्या घटनेनंतर नागपूर महापालिकेकडून जीर्ण इमारतींबाबत विशेष सतर्कता बाळगली जात असतानाच इतवारीतील ही घटना समोर आली आहे.
महापालिकेच्या नोंदीनुसार, नागपूर शहरात सध्या २७८ इमारती धोकादायक श्रेणीत आहेत. त्यापैकी २४७ इमारतींना घरे रिकामी करून दुरुस्ती करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून, नागरिकांनीही अशा इमारतींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.