शहरात सध्या अवैध धंद्यांनी अक्षरशः डोके वर काढले असून, विशेषतः वरली मटका आणि जुगाराच्या अड्ड्यांमुळे वातावरण बिघडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बार्शीटाकळी (Illegal Gambling) : शहरात सध्या अवैध धंद्यांनी अक्षरशः डोके वर काढले असून, विशेषतः वरली मटका आणि जुगाराच्या अड्ड्यांमुळे वातावरण बिघडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये किरकोळ वाद-तंट्यांचे प्रमाण वाढले असून अनेक कुटुंबे आर्थिक व मानसिक अडचणीत सापडत आहेत.
शहरातील नवीन बसस्थानक, जुने बसस्थानक तसेच पंचायत समिती परिसर आणि मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वरली मटका आणि जुगाराचे अड्डे सुरू असल्याचे समोर आले आहे. हे सर्व अवैध प्रकार शहराच्या मध्यवर्ती व गर्दीच्या भागात खुलेआम सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, हे अड्डे पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावरच सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
वरली मटका आणि जुगाराच्या विळख्यात अनेक युवक अडकत असून, त्यातून कर्जबाजारीपणा, घरगुती कलह आणि गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. काही कुटुंबांवर तर उपासमारीची वेळ येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी या अवैध धंद्यांवर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांना आळा घालण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत विशेष मोहीम राबवून दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बार्शीटाकळी शहरातील या वाढत्या अवैध धंद्यांमुळे गोरगरीब नागरिक संकटात सापडत असून, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करून हे अड्डे बंद करावेत, अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.