HSRP Number Plate: एचएसआरपी (उच्चसुरक्षा क्र.पाटी) न बसवलेल्या सर्व वाहनांवर १ जुलैपासून कायदा लागू होईल. ३० जूनपर्यंत अपॉइंटमेंट घेतल्यास कायदेशीर कारवाई बचावत नाही.
३० जूनपर्यंत अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना दिलासा
नागरिकांनी तातडीने एचएसआरपी बसविण्याचे आवाहन
हिंगोली (HSRP Number Plate) : हिंगोली जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० नुसार सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. दि. १ जुलै २०२६ पासून एचएसआरपी न बसविणाऱ्या सर्व जुन्या व नव्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, दि. ३० जून २०२६ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या दि. १८ मे २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार दि. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी बसविण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे दि. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे निर्देश दिले आहेत.
याशिवाय, एचएसआरपी (HSRP Number Plate) न बसविणाऱ्या वाहनधारकांच्या वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे आदी कामांवर यापूर्वीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच, यापुढे एचएसआरपी नसलेल्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल, परवाना नूतनीकरण आदी सर्व कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळता) करण्यात येणार नाहीत. जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी तात्काळ आपल्या वाहनांना एचएसआरपी बसवून घेऊन कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन हिंगोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांनी केले आहे.