Hingoli Municipal Council: हिंगोलीचे आमदारी तान्हाजीराव मुटकुळे आणि संतोष बांगर यांनी एकत्रितपणे रेल्वे उड्डाणपूल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व इतर कामांचे भौमिपूजन
हिंगोली नगर पालिकेतील विकास कामांसाठी आ. संतोष बांगर, आ. तान्हाजी मुटकुळे आले एकत्र
हिंगोली (Hingoli Municipal Council) : नगर पालिका निवडणुकीमध्ये महायुती एकमेका विरूध्द लढली. प्रचारा दरम्यान दोन्ही लोकप्रतिनिधींनी एकमेंकावर आरोप प्रत्यारोप केले. निवडणुकीत महायुतीतील शिवसेनेचा मोठा विजय झाला तर भाजपाचे पानिपत झाले. त्यामुळे महायुती दुभंगली होती. परंतु १२ जुलै रोजी आमदार तान्हाजीराव मुटकुळे, आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन पार पडले. त्यामुळे दोन आमदारांतील फिलगुड मुळे विकासाला बुस्टर डोस मिळेल अशीच चर्चा ऐकावयास मिळत होती.
हिंगोली शहराच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आज पार पडला. तब्बल १५ वर्षांपासून रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रेल्वे उड्डाणपूल, रीसाला बाजार मार्ग या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. जनतेला दिलेला शब्द पूर्ण करत मुटकुळे यांनी हिंगोलीच्या प्रगतीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. हा रस्ता केवळ वाहतुकीसाठीच नाही तर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त होते. आमदार मुटकुळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा बहुप्रतीक्षित प्रकल्प आता प्रत्यक्षात उतरत आहे.

भूमिपूजनानंतर शहराला सुरक्षित, दर्जेदार आणि सुलभ दळणवळणाची सुविधा मिळणार असून रेल्वे उड्डाणपुलाच्या सुशोभिकरणाचे काम देखील वेगाने सुरू आहे. या सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर, या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,कार्यकारी अभियंता सुरेश जोशी, माजी नगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष जगजीतराज खुराणा, नगरसेवक गणेश बांगर, ज्येष्ठ नेते के. के. शिंदे, प्रशांत पाटील गोरेगांवकर, जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, शासकीय कंत्राटदार मयुर कयाल, नगरसेवक हमीद प्यारेवाले, उमेश गुठ्ठे, कैलाश शहाणे, अजय गायकवाड, अनिल नेनवाणी,शहराध्यक्ष रजनीश पुरोहीत, अॅड.अमोल जाधव, संजय खंडेलवाल, बाबाराव घुगे, गोल्डी सोनी, भैय्या सवनेकर, सदाशिव सुर्यतळ, डॉ.माणीक देशमुख,नरेश अग्रवाल, समिर भिसे, पप्पु भट्ट, सचिन शिंदे, पद्माकर नायक यांच्यासह महायुतीचे व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हिंगोली शहरातील नागरिक उपस्थित होते.
'वचनपूर्ती, विकास आणि जनसेवा' हाच आपला ध्यास असल्याचे सांगत आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी येत्या काळात हिंगोलीला विकासाच्या दिशेने आणखी पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. या रस्त्यामुळे शहराच्या वाहतुकीला गती मिळणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल होणार आहे. हिंगोलीच्या विकासाचा प्रवास आता अधिक वेगाने सुरू राहणार असल्याचा विश्वास यावेळी सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.