हिंगोली (Hingoli Election) : जिल्ह्यात पुर्वी शासकीय सेवेत राहिलेल्या व नंतर राजकारणात गेलेल्या रामदास पाटील सुमठाणकर व साहेबराव कांबळे या दोघांनी घेतलेल्या माघारीची जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत आहे. कोरोना काळात हिंगोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी राहिलेल्या रामदास पाटील सुमठाणकर यांनी बदली झाल्या नंतर शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. त्यानंतर झालेल्या लोकसभा व (Hingoli Election) विधानसभा निवडणुकीत त्यांनी हिंगोलीतून उमेदवारी मागितली होती.
उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन सुमठाणकर यांनी हिंगोली विधानसभेची निवडणुक (Hingoli Election) अपक्ष म्हणुन लढविली होती. निवडणुकी नंतर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. काही दिवस हिंगोलीत राहिल्या नंतर त्यांनी नांदेड जिल्ह्यात बस्तान टाकले. पुढे त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. विधान परिषदेच्या निवडणुकीत जागा काँग्रेसला सुटल्याने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. गुरुवारी अचानक त्यांनी माघार घेतल्याने त्यांच्या राजकीय प्रवासा बद्दल हिंगोलीत चांगलीच चर्चा रंगत आहे.
सुमठाणकर यांच्याप्रमाणेच साहेबराव कांबळे हे सुद्धा हिंगोली जिल्ह्यात पंचायत समितीचे गट विकास अधिकारी होते.सेवा निवृत्ती नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊन उमरखेड विधान सभेची निवडणुक लढविली होती. ते पक्षातर्फे हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या नंतर त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी काँग्रेस पक्षातर्फे विधान परिषदेची उमेदवारी मिळविली होती. गुरुवारी अचानक त्यांनी सुद्धा आपली उमेदवारी परत घेऊन महायुतीच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला.
हिंगोली जिल्ह्यातून गेलेल्या या दोन माजी अधिकार्यांनी घेतलेली माघार जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. विशेष म्हणजे दोघेही काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. दरम्यान, जिल्ह्याचे प्रभारी साहेबराव कांबळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीतून (Hingoli Election) माघार घेतल्याने त्यांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. सचिन नाईक यांनी दिली.