शेतकऱ्याच्या फळबाग योजनेच्या कामासाठी लाच मागणाऱ्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.
हिंगोली (Hingoli ACB) : शेतकऱ्याच्या फळबाग योजनेच्या कामासाठी लाच मागणाऱ्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. औंढा नागनाथ तालुक्यात गुरुवारी (ता. १८) सायंकाळी बसस्थानकासमोर ही कारवाई करण्यात आली. मोहन माने असे लाच स्वीकारताना पकडलेल्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या आईच्या नावे असलेल्या शेतात कृषी विभागाच्या फळबाग योजनेअंतर्गत केळीची लागवड करण्यात आली होती. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मस्टरवर स्वाक्षरी करून कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणे आवश्यक होते. त्यासाठी तक्रारदाराने सहाय्यक कृषी अधिकारी मोहन माने यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, माने यांनी सुरुवातीला टाळाटाळ करत कामासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
तडजोडीनंतर पाच हजार रुपये देण्याचे ठरले. लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदाराने थेट हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व उपअधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार भगवान मंडलिक तसेच गजानन पवार, शिवाजी वाघ आणि शेख अकबर यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी औंढा नागनाथ बसस्थानकासमोर सापळा रचला.
सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास मोहन माने तेथे आले आणि त्यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.