पुणे शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
धरणांमधून विसर्गात वाढ; मुठा आणि घोड नदीकाठी सतर्कतेचा इशारा, भिडे पूल पाण्याखाली
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीन प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे प्रशासनाने धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुठा आणि घोड नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सिंचन विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला धरणाचे ११ दरवाजे तीन फूट उघडण्यात आले असून सध्या धरणातून ३५ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवत ४५ हजार क्युसेक्सपर्यंत नेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
पाणीसाठ्याच्या दृष्टीने खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही धरणे १०० टक्के भरली आहेत. तुलनेने कमी पाणलोट क्षेत्र असलेले टेमघर धरण सध्या ८३ टक्के भरले आहे. दरम्यान, पानशेत धरणाच्या सांडव्यावरील विसर्गातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात पावसाचा जोर कायम असल्याने डिंभे धरणातून घोड नदीपात्रात ९ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे. पुढील काही तासांत पाऊस कायम राहिल्यास या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
मुठा नदीत ४५ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे नदीकाठावरील रस्ते, पूल तसेच नदीपात्रातील अनधिकृत बांधकामांवर पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी जाणे टाळण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील विसर्ग सातत्याने वाढवला जात असून नदीपात्रातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. सध्या २७ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू असून तो वाढवून ३७ हजार क्युसेक्सपर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.