कुरखेडा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गूरनोली परिसरात मोठे नुकसान झाले आहे.
गूरनोली व बिजापूर येथे घटना; शेतकरी व मच्छीमारांचे मोठे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी
कुरखेडा : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गूरनोली परिसरात मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मध्यरात्री गूरनोली येथील मोठ्या तलावाची पार फुटून मोठे भगदाड पडले. त्यामुळे तलावाखालील शेकडो एकर शेतजमिनीत पाणी शिरून धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
यंदा तालुक्यात नुकताच धान रोवणीचा हंगाम पूर्ण झाला असून पिके जोमाने वाढू लागली होती. मात्र अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे तलाव फुटल्याने मोठ्या वेगाने आलेल्या पाण्याच्या प्रवाहात अनेक शेतांतील धान पीक वाहून गेले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे शंभर एकरांहून अधिक क्षेत्रातील पिकांची नासाडी झाली आहे.
याशिवाय तलावाच्या पारीलगत असलेल्या आठ ते दहा एकर शेतजमिनीत मुरूम, रेती व गाळाचा जाड थर साचल्याने ती जमीन लागवडीस अयोग्य होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या समोर उपजीविकेचे संकट उभे ठाकले आहे.
या घटनेची माहिती महसूल प्रशासनाला मिळताच तहसीलदार शशिकांत जाधव यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
दरम्यान, दुसरी घटना बिजापूर येथे घडली. येथील जुना मामातलावाची पार फुटल्याने सुमारे ६५ किलो मत्स्यबीज वाहून गेले. तसेच शेकडो एकर क्षेत्रावरील धान पीकही वाहून गेल्याने शेतकरी व मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे.
या सर्व परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट यांच्यासह प्रभाकर तुलावी व दिलीप दर्रो यांनी केली आहे.