Chikhli-Pensavangi Road: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव आणि आमदार निर्देशानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी तात्काळ रस्त्याच्या अवस्थेची पाहणी करून रस्त्याचे रखडलेले डांबरीकरण काम
काल आदेश, आज अधिकारी रस्त्यावर!
चिखली (Chikhli-Pensavangi Road) : चिखली–पेनसावंगी मार्गावरील रखडलेल्या रस्ते कामाबाबत नागरिकांनी मांडलेल्या समस्येची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले व आमदार श्वेता महाले पाटील यांनी तात्काळ दखल घेतली असून, त्यांच्या निर्देशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अवघ्या एका दिवसात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणीसाठी दाखल झाले.
दि. ७ जून रोजी विद्याधर महाले यांनी शेलगाव जहागीर, खंडाळा व एकलारा परिसराचा दौरा केला. यावेळी (Chikhli-Pensavangi Road) सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी चिखली–खंडाळा–शेलगाव जहागीर–एकलारा–पाटोदा–भोरसा–भोरसी–पेनसावंगी या महत्त्वाच्या मार्गावरील रखडलेल्या डांबरीकरणाच्या कामाचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला. दोन महिन्यांपासून डांबर उपलब्ध नसल्याचे कारण देत काम बंद असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
या (Chikhli-Pensavangi Road) रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, खड्ड्यांमुळे शेतकरी, विद्यार्थी, प्रवासी तसेच रुग्णवाहिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास दळणवळण विस्कळीत होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. नागरिकांची व्यथा ऐकल्यानंतर विद्याधर महाले यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून रखडलेली कामे त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच शेलगाव–खंडाळा व शेलगाव–पेनसावंगी रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत स्पष्ट सूचना देत कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्यास सांगितले.
या निर्देशांची अंमलबजावणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता भगुरे व अभियंता मोहन केंदळे यांनी ८ जून रोजी भर उन्हात संबंधित मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेलगाव जहागीर व एकलारा येथील सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांशी चर्चा करण्यात आली. तसेच संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून काम तात्काळ सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर आणि काम लवकर सुरू होणार असल्याच्या आश्वासनामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या रस्त्याचा प्रश्न आता मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.