Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता ने कृषी कर्जमाफी, पीक वितरण आणि प्रधानमंत्रीच्या रोजगार योजना तुरत कार्यात आणण्यासाठी बँकांना निर्देश दिले.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे बँकांना निर्देश
हिंगोली (Collector Rahul Gupta) : जिल्ह्यातील सर्व बँकांनी शासकीय योजनांअंतर्गत कर्जवाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी समन्वयाने कार्य करावे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेशी संबंधित तक्रारी जिल्हा अग्रणी बँकेच्या निदर्शनास आणून त्यांचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत जिल्ह्यातील विविध बँकांच्या शासकीय योजनांअंतर्गत कर्जवाटप, प्रलंबित प्रकरणे तसेच विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी सुजीत झोडगे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँकांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा प्रतिनिधी, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्जासाठी आवश्यक प्रशिक्षणाची व्यवस्था स्थानिक स्तरावर पुरेशा संख्येअभावी पर्यायी स्वरूपात नांदेड येथील ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्याच्या सूचना दिल्या.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षणाबाबत अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी संबंधित विमा कंपनीने समाजमाध्यमांच्या माध्यमातून जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रत्येक बँकेने किमान पाच शेतकऱ्यांना गाय किंवा म्हैस खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
यावेळी पीक कर्ज वितरण, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, महिला बचत गटांना कर्जपुरवठा, कृषी कर्जमाफी तसेच इतर शासकीय योजनांअंतर्गत बँकांनी निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व बँकांनी सकारात्मक भूमिका घेऊन समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
कृषी, उद्योग व स्वयंरोजगार क्षेत्राला चालना देण्यासाठी पीक कर्ज, उद्योग कर्ज तसेच महिला बचत गटांच्या कर्ज प्रस्तावांना प्राधान्याने मंजुरी देऊन त्वरित कर्जवाटप करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.