Goregaon Jal Jeevan Mission: गोरेगाव येथील नागरिकांना सात वर्षांपासूनच भेडसावत असलेला पाणीप्रश्न आज अखेर जाहीर झाला आहे. बंद असलेल्या जलजीवन मिशनचा मुख्य लाईन पुन्हा सुरू
गोरेगाव (Goregaon Jal Jeevan Mission) : गोरेगाव येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर अखेर सकारात्मक तोडगा निघाला असून, जलजीवन मिशन अंतर्गत तीन वर्षांपासून बंद पडलेले मेन लाईनचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. यामुळे गोरेगावसारख्या मोठ्या लोकवस्तीच्या गावाला लवकरच हक्काचे व शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कामासाठी आमदार संतोष बांगर, युवा सेना जिल्हा प्रमुख राम कदम, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. गोरेगाव चौफुली येथे करण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन, विविध शासकीय कार्यालयांना दिलेली निवेदने, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठका आणि सतत केलेला पत्रव्यवहार यामुळे प्रशासनाला या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी लागली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, हिंगोली यांनी यापूर्वी गोरेगावला सहा महिन्यांच्या आत पाणीपुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत असून बंद पडलेले काम पुन्हा गतीने सुरू करण्यात आले आहे. यामुळे जलजीवन मिशनच्या कामाला नवसंजीवनी मिळाली आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत शिवसेना तालुका प्रमुख अमोल पाटील खिल्लारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी गावकऱ्यांच्या पाणीप्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनासमोर प्रश्न प्रभावीपणे मांडला. त्यांच्या अथक प्रयत्नांना आणि संघर्षाला आज यश मिळाले असून गोरेगावच्या विकासाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
गोरेगावसह परिसरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून काम वेळेत पूर्ण करून गावाला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी केलेला संघर्ष आणि त्यातून मिळालेले हे यश भविष्यातील विकासकामां साठीही प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
"जनतेच्या हक्कासाठी संघर्ष, विकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि गोरेगावकरांना हक्काचे पाणी मिळवून देण्याचा निर्धार यामुळेच आज हा महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे." असे मत शिवसेना तालुका प्रमुख अमोल पाटील खिल्लारी यांनी व्यक्त केले.