बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे पवित्र अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मोठे संकट कोसळले.
माजलगाव तालुक्यातील दुर्घटनेत ५० ते ६० भाविक बोटीत असल्याची माहिती; २० जणांची सुटका, बेपत्ता भाविकांचा शोध सुरू
बीड (Godavari river boat accident) : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे पवित्र अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मोठे संकट कोसळले. गोदावरी नदीपात्रातून प्रवास करणारी भाविकांची बोट अचानक उलटल्याने गंभीर दुर्घटना घडली असून प्रशासन आणि स्थानिकांकडून तातडीने बचाव मोहीम राबविण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त बोटीत सुमारे ५० ते ६० भाविक प्रवास करत होते. दुर्घटनेनंतर स्थानिक बोट चालक तसेच प्रशासनाच्या पथकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. आतापर्यंत २० भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित प्रवाशांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली आहे. गोदावरी नदी पार करण्यासाठी भाविकांना बोटींचा वापर करावा लागतो. दरम्यान, अधिक उत्पन्नाच्या हेतूने काही बोटींमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जात असल्याचा आरोप स्थानिक स्तरावर करण्यात येत आहे.
याच निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याची चर्चा सुरू असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतल्याने बोट नदीपात्रात उलटल्याचा आरोप केला जात आहे. या अपघातात काही लहान मुले बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दुर्घटनेची तीव्रता अधिक गंभीर मानली जात आहे.
बोटीत अंदाजे ६० जण असल्याचे सांगितले जात असून त्यापैकी २० जणांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित भाविकांचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात बचावकार्य अखंडपणे सुरू असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.