सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील जाधव कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गोवा आणि सिंधुदुर्ग परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू आहे.
गोव्यातील करासवाडा येथील भाड्याच्या घरातील धक्कादायक घटनेने खळबळ; म्हापसा पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू
सिंधुदुर्ग (Goa Mystery Death) : गोव्यातील करासवाडा-म्हापसा परिसरात एका भाड्याच्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या पिता-पुत्राच्या मृत्यूनंतर उपचार सुरू असलेल्या पत्नीचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील जाधव कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गोवा आणि सिंधुदुर्ग परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू आहे.
या घटनेत अजय जाधव (वय ३८) आणि त्यांचा सात वर्षीय मुलगा अथर्व अजय जाधव यांचा जागीच मृत्यू झाला होता. गंभीर अवस्थेत आढळलेल्या सुवर्णा अजय जाधव (वय ३०) यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा दुर्दैवी अंत झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंब मूळचे सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावचे आहे. रोजगाराच्या निमित्ताने ते गेल्या वर्षभरापासून गोव्यात वास्तव्यास होते. करासवाडा येथील साईनगर भागातील एका भाड्याच्या घरात ते राहत होते. अजय जाधव हे पणजीतील एका खासगी बँकेत कार्यरत होते, तर सुवर्णा जाधव या गृहिणी होत्या. त्यांचा मुलगा अथर्व स्थानिक शाळेत शिक्षण घेत होता.
या प्रकरणाची सुरुवात शुक्रवारी रात्री अजय जाधव यांनी सोनुर्ली येथे राहणाऱ्या आपल्या वडिलांशी दूरध्वनीवर संपर्क साधल्यानंतर झाली. त्यानंतर शनिवारी सकाळपासून त्यांच्या मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही. वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने चिंतेत पडलेल्या वडिलांनी थेट करासवाडा येथील त्यांच्या राहत्या घरी धाव घेतली.
घरात प्रवेश करताच अजय आणि अथर्व हे दोघेही बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले, तर सुवर्णा जाधव गंभीर अवस्थेत होत्या. तातडीने रुग्णवाहिका आणि डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अजय आणि अथर्व यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सुवर्णा यांना तातडीने पुढील उपचारासाठी गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी उपचार सुरू असतानाच त्यांचीही प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. ही घटना कौटुंबिक तणावातून घडलेला सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न आहे की विषबाधा अथवा अन्य कोणते कारण यामागे आहे, याचा सर्व अंगांनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, रविवारी दुपारी अजय जाधव आणि चिमुकल्या अथर्व यांच्या पार्थिवावर सोनुर्ली येथील जाधववाडीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर सुवर्णा जाधव यांचाही मृत्यू झाल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. तिघांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधणे हे आता म्हापसा पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले असून तपास सुरू आहे.