गिरीश महाजन: महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपचे संकटमोचक आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी नेते म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या राजकीय प्रवासाबाबत मोठे संकेत
जळगाव (गिरीश महाजन) : महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपचे संकटमोचक आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी नेते म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या राजकीय प्रवासाबाबत मोठे संकेत दिले आहेत. "सात टर्म झाल्या... आता फार फार तर एखादी टर्म. कुठेतरी आपणही थांबलं पाहिजे," असे वक्तव्य करत महाजन यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकारातून विविध शासकीय कार्यालयांचे उद्घाटन आणि विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना महाजन यांनी केवळ निवृत्तीचे संकेतच दिले नाहीत, तर जळगाव भाजपच्या भविष्यातील नेतृत्वाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. "आम्ही आता किती दिवस काम करणार? पक्षाची धुरा सक्षम हातात द्यावी लागेल आणि मंगेश चव्हाण हेच जिल्ह्याचे भावी नेतृत्व करू शकतात," असे जाहीरपणे सांगत त्यांनी पुढील नेतृत्वाकडे अंगुलिनिर्देश केला.
मंगेश चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करताना महाजन म्हणाले की, पहिल्यांदा उमेदवारी मिळाली तेव्हा त्यांची फारशी ओळख नव्हती. मात्र, आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात विकासकामांचा अक्षरशः धडाका लावला असून त्यांच्या कामाचा हेवा वाटावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
याचवेळी महाजन (Girish Mahajan) यांनी नाव न घेता आपल्या राजकीय विरोधकांवरही निशाणा साधला. "कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे. नाहीतर काही जण प्रत्येक ठिकाणी 'मीच मीच' करत राहतात," असा टोला लगावत त्यांनी दीर्घकाळ सत्तेभोवती फिरणाऱ्या नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली.
गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे जळगाव भाजपमधील वर्चस्व निर्विवाद मानले जाते. त्यामुळे त्यांच्या तोंडूनच उत्तराधिकाऱ्याचे नाव पुढे आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू होणार का, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाजन यांच्या या वक्तव्याला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.