गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत क्रूर, अमानवीय आणि समाजमन हादरवणारे असल्याचे नमूद करत न्यायालयाने हा गुन्हा 'दुर्मिळातील दुर्मीळ' स्वरूपाचा मानला.
५८ दिवसांत खटल्याचा निकाल; न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी केले स्वागत
(Fast Track Court) पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत क्रूर, अमानवीय आणि समाजमन हादरवणारे असल्याचे नमूद करत न्यायालयाने हा गुन्हा 'दुर्मिळातील दुर्मीळ' स्वरूपाचा मानला. राज्याच्या इतिहासात अवघ्या ५८ दिवसांत या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागल्याने या प्रकरणाची विशेष दखल घेतली जात आहे.
या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालय, पोलिस यंत्रणा आणि तपास अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, नियोजित हत्या किंवा बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील प्रकरणेही फास्ट ट्रॅकवर चालवून त्यांचा लवकर निकाल लावला जाईल, अशी ग्वाही दिली. त्यांनी केतन अग्रवाल प्रकरणाचाही यावेळी विशेष उल्लेख केला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, नसरापूरमधील चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि हत्या हा अत्यंत अमानवीय प्रकार होता. अशा गंभीर गुन्ह्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याबद्दल त्यांनी न्यायालयाचे आणि न्यायाधीशांचे आभार मानले. पोलिसांनी अवघ्या दोन आठवड्यांत दोषारोपपत्र दाखल करून तपासातील सर्व महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. त्यामुळे न्यायालयानेही हा गुन्हा 'रेअरेस्ट ऑफ द रेअर' स्वरूपाचा मानत आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली, असे त्यांनी सांगितले.
यापुढे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. अशा शिक्षेमुळे समाजात गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल आणि भविष्यात अशा प्रकारची कृत्ये करण्याचे धाडस कोणी करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणावर सातत्याने लक्ष ठेवणारे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस अधिकारी, तपास पथक आणि सरकारी वकिलांचेही त्यांनी कौतुक केले.
केतन अग्रवाल प्रकरणाचा संदर्भ देत शिंदे म्हणाले की, नियोजनपूर्वक केलेल्या हत्या किंवा बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना तातडीने शिक्षा मिळावी यासाठी अशा प्रकरणांचा फास्ट ट्रॅक न्यायालयात वेगाने निपटारा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी सोशल मीडियावरील संदेशात म्हटले की, पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
महिला आणि मुलींची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत त्यांनी अशा अमानुष गुन्ह्यांना समाजात कोणतेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले. बलात्कार आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांबाबत कोणतीही माफी असू शकत नाही. अशा नराधमांविरोधात कठोरात कठोर कारवाई सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी समाज आणि प्रशासनाने अधिक सजग राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.