एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने १४ कोटी ५८ लाख ९० हजार रुपयांच्या मदत निधीचे वितरण मंजूर केले आहे.
हिंगोली (Farmer Relief Fund) : एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने १४ कोटी ५८ लाख ९० हजार रुपयांच्या मदत निधीचे वितरण मंजूर केले आहे. महसूल व वन विभागाने १२ जून रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील ११ जिल्ह्यांतील एकूण १६ हजार २६७ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात हिंगोली जिल्ह्यातील २९ शेतकऱ्यांच्या १५.२० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २ लाख ७३ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील ३ हजार २८२ शेतकऱ्यांसाठी २ कोटी ९१ लाख ८ हजार रुपये, तर धाराशिव जिल्ह्यातील १३ शेतकऱ्यांसाठी २ लाख ६६ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या विभागासाठी एकूण २ कोटी ९६ लाख ४७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पुणे विभागात सर्वाधिक मदत जाहीर झाली असून सांगली जिल्ह्यातील ८ हजार ८९७ शेतकऱ्यांना ७ कोटी २८ लाख ५९ हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय सोलापूर जिल्ह्यासाठी १ कोटी ४६ लाख ३३ हजार, सातारा जिल्ह्यासाठी २१ लाख ८८ हजार, पुणे जिल्ह्यासाठी २६ लाख ६० हजार आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी ३५ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे विभागासाठी एकूण ९ कोटी ५८ लाख ७५ हजार रुपयांची मदत निश्चित करण्यात आली आहे.
अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्यातील १ हजार २५१ शेतकऱ्यांसाठी १ कोटी २४ लाख ७३ हजार रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील १ हजार ३६३ शेतकऱ्यांसाठी ५६ लाख ३२ हजार रुपये, तर वाशीम जिल्ह्यातील १६८ शेतकऱ्यांसाठी २२ लाख ६३ हजार रुपयांची मदत मंजूर झाली आहे. या विभागासाठी एकूण २ कोटी ३ लाख ६८ हजार रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे.
राज्यातील एकूण ८ हजार ८९.१५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ही मदत जाहीर करण्यात आली असून, लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे थेट रक्कम जमा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या मदतीमुळे काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.