वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी शिवारात आढळलेल्या सुरेश राजाराम झळके (वय ३०, रा. अमानी) यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यात मालेगाव पोलिसांना यश आले आहे.
वाकळवाडी शिवारात सापडलेल्या सुरेश झळके यांच्या संशयास्पद मृत्यूचा काही तासांत उलगडा; अनैतिक संबंधातून कट रचल्याचा पोलिसांचा दावा
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी शिवारात आढळलेल्या सुरेश राजाराम झळके (वय ३०, रा. अमानी) यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यात मालेगाव पोलिसांना यश आले आहे. प्राथमिक तपासात अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला असून, या प्रकरणी मृताची पत्नी आशा सुरेश झळके आणि तिचा प्रियकर महादेव बजरंग अंभोरे (वय २५, रा. पूर, ता. मंगरुळनाथ) यांना अटक करण्यात आली आहे.
सुरेश झळके हे चार ते पाच दिवसांपासून पत्नीसह वाकळवाडी येथील सासरी वास्तव्यास होते. ३० जुलै रोजी वाकळवाडी शिवारातील सुनील चोंडकर यांच्या शेतात त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेश खेरडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
शवविच्छेदन आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे पोलिसांना मृत्यू संशयास्पद असल्याचे आढळून आले. त्यानंतर मृताची पत्नी आणि तिच्या परिचयातील महादेव अंभोरे यांची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेश झळके हे पत्नीच्या प्रेमसंबंधांना विरोध करत होते. त्यामुळे ते दोघांच्या संबंधात अडथळा ठरत असल्याने त्यांना संपविण्याचा कट रचण्यात आला. ३० जुलै रोजी सुरेश यांना प्रथम मद्यपान करण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यानंतर ते नशेत असताना दोरीने त्यांचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने मृतदेह शेतातील लिंबाच्या झाडाखाली टाकून देण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. सुरुवातीला या प्रकरणी मालेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासादरम्यान पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक गोखले, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन झगरे, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, पोलीस अंमलदार अमोल इरतकर तसेच चालक सुनील तायडे यांच्या पथकाने केला. दोन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत.
मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश खेरडे यांनी सांगितले की, वाकळवाडी शिवारात मृतदेह आढळल्यानंतर घटनास्थळावरील तपास आणि वैद्यकीय निरीक्षणातून गळा आवळल्याचा संशय निर्माण झाला. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराचा सहभाग उघड झाल्याने दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.