देशभरात पेपर फुटीच्या घटनांवरून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, आता पुण्यातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत धक्कादायक दावा समोर आला आहे.
VJTI, COEPमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंच्या व्यवहाराचा दावा; संभाषणानंतर चौकशीची मागणी
पुणे: देशभरात पेपर फुटीच्या घटनांवरून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, आता पुण्यातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत धक्कादायक दावा समोर आला आहे. प्रतिष्ठित सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देत लाखो रुपयांची मागणी केल्याचा दावा करणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
व्हायरल होत असलेल्या या ऑडिओमध्ये एका क्लास चालकाने प्रथम एका विद्यार्थ्याशी आणि त्यानंतर त्याच्या पालकाशी संवाद साधल्याचा दावा करण्यात आला आहे. या संभाषणात वीजेटीआय (VJTI) आणि सीओईपी (COEP) यांसारख्या नामांकित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याची तयारी असल्याचे संबंधित व्यक्ती सांगत असल्याचा दावा केला जात आहे.
या संवादानुसार, विद्यार्थ्याने संबंधितांनी सांगितलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यावी लागेल आणि तेथे त्यांच्या टीमकडून आवश्यक मदत केली जाईल, असे सांगितल्याचा दावा आहे. तसेच प्रवेश निश्चित झाल्यानंतरच पैसे द्यावे लागतील, सुरुवातीला कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचेही या संभाषणात नमूद करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
याशिवाय, संबंधित व्यक्तीने अशा प्रकारची व्यवस्था प्रथमच केली नसून, मागील वर्षीही शेकडो विद्यार्थ्यांना मदत केल्याचा दावा ऑडिओमध्ये करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
प्रवेशासाठी आवश्यक आर्थिक व्यवहाराबाबतही या संभाषणात चर्चा झाल्याचा दावा आहे. सरकारी टॉप तीन अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश हवा असल्यास सुमारे १३ ते १४ लाख रुपये खर्च येऊ शकतो. त्यामुळे पालकांचे बजेट आधी समजणे आवश्यक असल्याचे संबंधित क्लास चालक सांगत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, संबंधित कार्यालय ठाण्यात असल्याचाही उल्लेख या कथित संभाषणात असल्याचे समोर आले आहे.
ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विविध स्तरांतून केली जात आहे.