Economic Development Corporations: राजपूत समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाच्या वार्षिक निधीत मोठी वाढ
चिखली (Economic Development Corporations) : राजपूत समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाच्या वार्षिक निधीत मोठी वाढ करून तो सध्याच्या ५० कोटी रुपयांवरून २ हजार कोटी रुपये करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात समाजसेविका सौ. विद्याताई सुनील धंदर पाटील यांनी तहसीलदार, चिखली यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले. निवेदनात महाराष्ट्र शासनाने राजपूत समाजातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासासाठी महामंडळाची स्थापना करून घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
सध्या महामंडळासाठी केवळ ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, महाराष्ट्रातील राजपूत समाजाची लोकसंख्या, भौगोलिक विस्तार आणि समाजातील युवकांमधील वाढती बेरोजगारी लक्षात घेता हा निधी अपुरा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. समाजातील युवक, महिला बचत गट, लघुउद्योजक आणि विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजना, कर्ज सुविधा व आर्थिक मदत प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी भरीव निधीची आवश्यकता असल्याचेही सांगण्यात आले.
महाराणा प्रताप हे शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असून त्यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या (Economic Development Corporations) महामंडळाला अधिक सक्षम करण्यासाठी निधी वाढविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने समाजहिताचा विचार करून महामंडळाचा निधी वाढवून २ हजार कोटी रुपये करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.