कळमनुरी नगरपालिकेमार्फत साईनगर ते चिंचाळेश्वर महादेव मंदिर या मुख्य मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे.
व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान; नागरिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
कळमनुरी नगरपालिकेमार्फत साईनगर ते चिंचाळेश्वर महादेव मंदिर या मुख्य मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. भाजीमंडीजवळील नाल्यावर पूल बांधण्याऐवजी गोलाकार सिमेंट पाईप टाकण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
कळमनुरी शहरातील भाजीमंडीजवळ असलेल्या पुलाच्या पाईपमध्ये कचरा अडकल्यामुळे नाल्याचा पाण्याचा प्रवाह वारंवार बंद होत आहे. त्यामुळे शहरातील घाणेरडे सांडपाणी रस्त्यावर येऊन परिसरात दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनत असून साचलेले पाणी थेट दुकानांमध्ये शिरत असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
भाजीमंडी हा शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर असल्याने येथे दररोज शेकडो नागरिक आणि ग्राहकांची ये-जा असते. रस्त्यावर सांडपाणी साचल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे. तसेच अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
स्थानिक व्यापारी व नागरिकांनी भाजीमंडीजवळ पाईपऐवजी नियोजनानुसार मजबूत पूल उभारण्याची मागणी केली आहे. तसेच तातडीने पाईप काढून त्या ठिकाणी पुलाचे काम करून नाल्याचा प्रवाह सुरळीत करावा, अन्यथा पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
या प्रकरणी नगरपालिकेने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून रस्त्यावर घाण पाणी येण्याचा प्रश्न निकाली निघेल आणि व्यापारी तसेच नागरिकांना दिलासा मिळेल, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
पुलावरून घाणेरडे पाणी रस्त्यावर येत असल्याची माहिती मिळताच नगरपालिका मुख्याधिकारी रविराज तदरक, उपनगराध्यक्ष शिवराज पाटील, आर. आर. पाटील आणि नगरसेवक बबलू पत्की यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. अडकलेले पाणी काढण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र पाणी न निघाल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने प्रेशरच्या सहाय्याने पाणी काढण्याचा प्रयत्न केला, तरीही पाणी निघाले नाही. सध्या सफाई कर्मचारी पाणी काढण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत.
"गुत्तेदाराने पैसे वाचविण्यासाठी पाईप टाकले" — विनोद बांगर
कळमनुरी शहरातील भाजीमंडी नाल्यावर मोठा पूल बांधणे आवश्यक असताना संबंधित गुत्तेदाराने खर्च वाचविण्यासाठी पुलाऐवजी पाईप टाकल्याचा आरोप विनोद बांगर यांनी केला आहे. या पाईपमध्ये कचरा अडकल्याने घाणेरडे पाणी रोखले जाऊन ते संपूर्ण रस्त्यावर आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित गुत्तेदारावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
"पूल बांधकामासाठी प्रयत्न करणार" — नगराध्यक्षा आश्लेषा वैभव पाटील
नगराध्यक्षा आश्लेषा वैभव पाटील यांनी सांगितले की, हा पूर्वीच्या अंदाजपत्रकानुसार तयार करण्यात आलेला प्रकल्प आहे. या पुलाच्या बांधकामाबाबत सविस्तर पाहणी करून आवश्यक माहिती घेतली जाईल. गरज भासल्यास नवीन ठराव मंजूर करून संबंधित ठिकाणी पूल बांधण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.