विवाहितेचा छळ करून तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने तणनाशक रसायन पाजल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सोनपेठ तालुक्यातील खपाटपिंपरी तांडा येथील घटना; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
परभणी (Domestic Violence) : सोनपेठ तालुक्यातील खपाटपिंपरी तांडा येथे धोंडे जेवणाच्या वेळी माहेरकडून सोन्याची अंगठी न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करून तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने तणनाशक रसायन पाजल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत गंभीर झालेल्या विवाहितेवर अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, उपचारादरम्यान दिलेल्या तक्रारीवरून २२ जून रोजी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आशा उर्फ गोभा आडे यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, ८ जून रोजी सकाळी त्या धोंडे कार्यक्रमासाठी माहेरी गेल्या होत्या. त्यावेळी सासरच्या मंडळींनी, "तुझ्या आई-वडिलांकडून सोन्याची अंगठी घेऊन ये," अशी मागणी केली होती.
यानंतर १३ जून रोजी त्या सासरी परतल्यानंतर, अंगठी का आणली नाही, असे म्हणत त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर १४ जून रोजी पुन्हा मारहाण करून बळजबरीने घरातील तणनाशक रसायन त्यांच्या तोंडात ओतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
विवाहितेचा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारे नातेवाईक घटनास्थळी आले. त्यांनी तत्काळ विवाहितेला उपचारासाठी सोनपेठ येथील रुग्णालयात दाखल केले. तेथील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
उपचारादरम्यान विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पती लालासाहेब उर्फ नितीन आडे, सासू शालूबाई आडे आणि सासरे अनिल आडे यांच्याविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.