महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा लागू असतानाही गोवंशांना बेकायदेशीररीत्या डांबून ठेवून त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे.
व्हीएचपी व बजरंग दलाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन
हिंगोली : वसमत येथे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गोवंश छळ प्रकरणात वसमत नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान नाशेर अली यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना सार्वजनिक पदावरून हटविण्याची मागणी विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी), बजरंग दल तसेच हिंदू समाजाच्या नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, २९ जुलै रोजी रात्री वसमत–पूर्णा कारखाना मार्गावरील जवळा खंदारबन शिवारातील गट क्रमांक ३२ मधील एका शेतावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईदरम्यान शेतात १९ गोवंश जनावरे चारा व पाणी न देता क्रूर पद्धतीने बांधून ठेवण्यात आल्याचे आढळल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा लागू असतानाही गोवंशांना बेकायदेशीररीत्या डांबून ठेवून त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे. जनावरांना उपाशी ठेवून त्यांचे हिमोग्लोबिन कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत, या प्रकरणातील दोषी सय्यद इम्रान नाशेर अली यांना उपनगराध्यक्ष पदावरून हटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी बद्रीभाऊ सारडा, प्रकाश सोनी, राजेंद्र हलवाई, कैलास श्रीनाथ, दीपक निमोदिया, गणेश जाधव, नामदेव मस्के, प्रदीप उपाध्ये, सीमा हवालदार, वासुदेव शांडील्य, विजय शिंदे, चंद्रशेखर लांडगे, सचिन करवंदे, लक्ष्मण सुरदूसे, गणेश सोळंके आदी उपस्थित होते.