अयोध्या श्रीराम मंदिर दान प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेसने नाशिकमधील प्रसिद्ध काळाराम मंदिराबाहेर 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह आंदोलन आयोजित केले.
नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असताना, अयोध्या श्रीराम मंदिर दान प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेसने नाशिकमधील प्रसिद्ध काळाराम मंदिराबाहेर 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह आंदोलन आयोजित केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात रामभजन करण्यात आले आणि केंद्र तसेच राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यापूर्वी हवामान विभागाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता वर्तवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संभाव्य अतिवृष्टीबाबत माहिती दिली होती. तसेच पालघरमध्ये मुसळधार पावसास कारणीभूत ठरलेला हवामानातील भोवरा नाशिककडे सरकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, नंतर या भोवऱ्याने दिशा बदलल्याने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरावरील अतिवृष्टी व ढगफुटीचा धोका टळल्याचे चित्र निर्माण झाले.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी 'चौकीदार चोर है, देश लुटला आता रामाचे दानही लुटले' अशा आशयाचे फलक हातात घेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी श्रीराम मंदिर दान प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
सपकाळ म्हणाले, देशाचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालणे अपेक्षित असताना माहिती अधिकाराच्या तत्त्वालाच धक्का बसला आहे. राम मंदिरातील विश्वस्त व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेच्या चोरीची सखोल चौकशी झाली पाहिजे. याच मागणीसाठी हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले असून, आगामी काळात महाराष्ट्रभर व्यापक आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एसआयटीच्या चौकशीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. चोरीप्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित करत सपकाळ यांनी चंपत राय यांच्या संदर्भातही टीका केली. या प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये निष्पक्षतेचा अभाव असल्याचा आरोप करत जनतेसमोर संपूर्ण हिशेब मांडण्याची मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत सपकाळ म्हणाले की, आंदोलनावर परिणाम व्हावा म्हणून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचा इशारा अतिरंजित पद्धतीने मांडण्यात आला. तसेच सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यास का तयार नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एसआयटीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राम मंदिराशी संबंधित निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केला आणि संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी पुन्हा एकदा केली.