स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, विज्ञान व कै. पांडुरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालय, मानोरा येथील कला विभागाच्या वतीने आयोजित बी.ए. भाग तृतीय विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला.
बी.ए. अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात उत्साहात !
मानोरा (College Farewell Event) : स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, विज्ञान व कै. पांडुरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालय, मानोरा येथील कला विभागाच्या वतीने आयोजित बी.ए. भाग तृतीय विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी संदेश देणारा हा सोहळा ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "पदवी शिक्षण संपले असले तरी महाविद्यालयाचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी सदैव खुले आहेत. या संस्थेशी असलेले आपले नाते कायम जपावे," असे भावनिक प्रतिपादन त्यांनी केले. तसेच जीवनातील पुढील वाटचालीत प्रामाणिकपणा, कष्ट आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली यांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पंकज गावंडे यांनी केले. त्यांनी बी.ए. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक प्रगतीचा आढावा घेत त्यांच्या सर्वांगीण विकासाचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात जपलेली शिस्त, संस्कार आणि मूल्ये त्यांच्या भविष्यातील यशाची भक्कम पायाभरणी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. जयवंत कांबळे, डॉ. ए. वाय. अली, डॉ. नक्षीने मॅडम, प्रा. बेलखेडे, प्रा. अश्विनी राठोड, प्रा. सोनल डेरे तसेच प्रा. मिलिंद मनवर यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान बी.ए. भाग तृतीयचे विद्यार्थी दर्शन विलायतकर व अभिषेक इंगळे यांनी महाविद्यालयाला तिरंगा ध्वजाची प्रतिमा तसेच भारतीय संविधानाची उद्देशिका भेट स्वरूपात प्राचार्यांना प्रदान केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि संविधानिक मूल्यांप्रती असलेली जाणीव अधोरेखित केली.
निरोप समारंभात विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयीन जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. वर्गखोलीतील अनुभव, जुळलेले मैत्रीचे बंध, विविध उपक्रमांतील सहभाग तसेच शिक्षकांशी असलेले आत्मीय नाते यांचा उल्लेख करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या क्षणी सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए. भाग द्वितीयचे विद्यार्थी प्रफुल राठोड यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाची सांगता कविता बोचट यांनी आभार प्रदर्शनाने केली.