आईसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला असून उर्वरित दोन मुले गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.
रायगडच्या खरवली आदिवासी वाडीत घडलेल्या घटनेने परिसरात शोककळा; पोलीस तपास सुरू
रायगड (Cold Drink Poisoning) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडीत अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, जन्मदात्या आईने आपल्या चार लहान मुलांना थंडपेयातून विष प्राशन करवून स्वतःही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत आईसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला असून उर्वरित दोन मुले गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.
या घटनेतील मृत महिलेचे नाव आशा जाधव (वय २९ वर्षे) असे असून, त्यांच्यासोबतच त्यांची मुलगी नंदिनी जाधव (वय ७ वर्षे) आणि दुर्वा जाधव (वय ६ वर्षे) या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आशा जाधव यांनी प्रथम आपल्या चारही मुलांना थंडपेयामध्ये विष मिसळून दिले आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. काही वेळातच सर्वांची तब्येत अचानक बिघडल्याने हा प्रकार शेजारी आणि नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यानंतर सर्वांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच आई आणि दोन मुलींचा मृत्यू झाला.
या घटनेत आशा जाधव यांची आणखी दोन मुले गंभीर जखमी असून त्यांच्यावर माणगाव येथील सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी तसेच रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, या टोकाच्या पावलामागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे. संपूर्ण खरवली परिसरात या दुर्दैवी घटनेमुळे शोक आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.