वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आज नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली.
कारंजा (Botona ZP School) : वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आज नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर विद्यार्थी नव्या दप्तरासह आणि नव्या उत्साहात शाळेत दाखल झाले. मात्र, कारंजा तालुक्यातील बोटोना येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात पावसाचे पाणी साचल्याने विद्यार्थ्यांच्या पहिल्याच दिवसाच्या आनंदावर पाणी फिरले.
मुसळधार पावसामुळे शाळेच्या प्रवेशद्वारासह संपूर्ण आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत प्रवेश करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना चिखल आणि साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत वर्गात जावे लागले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अशा गैरसोयीला सामोरे जावे लागल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थ आणि पालकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शाळेच्या आवारातील पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा परिसरातील जलनिकासीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.