Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मुंबई

Bhiwandi Building Collapse

भिवंडी इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; चौकशीचे आदेश, दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

भिवंडीतील नारपोली परिसरात कोहिनूर अपार्टमेंट कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.


भिवंडी इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल चौकशीचे आदेश दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

Bhiwandi Building Collapse |

कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची शोकसंवेदना

भिवंडीतील नारपोली परिसरात कोहिनूर अपार्टमेंट कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टद्वारे दिली.

भिवंडी शहरातील बालाजी नगर, गंगारामवाडी येथील १२ ते १४ वर्षे जुनी असलेली चार मजली 'कोहिनूर अपार्टमेंट' इमारत अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून, ढिगाऱ्याखाली आणखी २ ते ३ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्थापन पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. "भिवंडीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही नागरिकांचा मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी," असे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचे त्यांनी नमूद केले.

प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या पिलरच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. विशेष म्हणजे, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक घोषित करून यापूर्वीच नोटीस बजावली होती. तरीही दुर्घटना घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता या प्रकरणातील चौकशी आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही दुर्घटना गुरुवारी (३० जुलै) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. घटनेनंतर पालिकेच्या आपत्कालीन कक्षातील अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. मात्र, दुर्घटनास्थळाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने बचावकार्यात सुरुवातीला अडथळे निर्माण झाले. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास एनडीआरएफ आणि टीडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली. इमारतीसमोरील जुनी चाळ जेसीबीच्या साहाय्याने हटवल्यानंतर बचाव पथकांना ढिगाऱ्यापर्यंत पोहोचता आले आणि त्यानंतर शोध व बचाव मोहिमेला वेग आला.

दुर्घटनेतून बचावलेल्या रहिवाशांनीही त्या क्षणांचा थरार सांगितला. अरविंद गुप्ता आणि त्यांच्या पत्नीने इमारत कोसळत असताना बाहेर पडून जीव वाचवला, मात्र त्यांची मुलगी कोमल ढिगाऱ्याखाली अडकली होती. तिने स्वतःच्या प्रयत्नांनी बाहेर पडत जीव वाचवल्याची माहिती दिली. पिलरच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच दुर्घटना घडल्याचे तिने सांगितले. स्थानिक तरुणांनीही तत्काळ मदतकार्य करत अनेक रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले, तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांची सुटका करण्यातही यश मिळवले. अद्याप पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. नारपोली येथील कोहिनूर इमारतीचा काही भाग कोसळून निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच जखमींवर तातडीने उपचार सुरू असून, एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. बाधित कुटुंबांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related to this topic: