ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली.
अतिधोकादायक घोषित इमारत रात्री कोसळली; एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि प्रशासनाचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. नारपोली परिसरातील गंगारामवाडी येथे असलेली चार मजली कोहिनूर अपार्टमेंट ही इमारत रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर आणखी काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, घटनास्थळी बचाव आणि शोधमोहीम वेगाने सुरू आहे.
माहितीनुसार, कोहिनूर अपार्टमेंट ही इमारत २००७ मध्ये उभारण्यात आली होती. दोन विंग आणि एकूण ३० निवासी घरे असलेल्या या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. निकृष्ट बांधकामामुळे भिवंडी महानगरपालिकेने या इमारतीला यापूर्वीच अतिधोकादायक घोषित केले होते.

गुरुवारी तळमजल्यावरील काही पिलरमध्ये बिघाड झाल्याने त्यांची दुरुस्ती सुरू होती. सायंकाळी सुमारे सहा वाजल्यापासून इमारतीला तडे पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास संपूर्ण इमारत एका बाजूला झुकत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रभाग समिती क्रमांक ४ चे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी पालिका कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि इमारत रिकामी करण्याची कारवाई केली. मात्र, त्यानंतरही तळमजल्यावरील दुरुस्तीचे काम सुरूच होते. तसेच काही रहिवासी घरातील साहित्य काढण्यासाठी पुन्हा इमारतीत गेल्याने अचानक संपूर्ण इमारत कोसळली आणि अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले.
सध्या जेसीबीसह विविध यंत्रणांच्या साहाय्याने मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलीस आणि भिवंडी महानगरपालिका प्रशासन संयुक्तपणे बचावकार्य राबवत आहेत.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये शमीम शेख (३२), रंजीत सिंग (४५), मिराज रसूल शेख (३४), संतोष कुमार पांडे (४२) आणि शमीम अन्सारी (३०) यांचा समावेश आहे. तसेच दोन मृतांची ओळख अद्याप पटलेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.