गेल्या दोन दिवसांपासून भडगाव शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले.
भडगाव : गेल्या दोन दिवसांपासून भडगाव शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, प्रभाग क्रमांक १० मधील यशवंत नगर गणपती मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गणपती मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार तसेच स्थानिक नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांनाही सावधगिरीने प्रवास करावा लागत असून, पाण्याखाली खड्डे असल्यास अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक पावसाळ्यात या ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण होते. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने दरवर्षी रस्ते जलमय होतात. त्यामुळे संबंधित प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने आणखी पाणी साचण्याची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनानेही तातडीने या परिसराची पाहणी करून पाणी उपसण्याची व निचरा व्यवस्था सुधारण्याची गरज व्यक्त होत आहे.