राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या सध्या दोन दिवसांच्या नियोजित बीड दौऱ्यावर आहे.
दोन दिवसांच्या दौऱ्यात विकासकामांच्या बैठका, लोकप्रतिनिधींशी संवाद आणि अमरावतीतील पूरस्थितीबाबत प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या सध्या दोन दिवसांच्या नियोजित बीड दौऱ्यावर असून विकासकामांचा वेग कायम ठेवण्यासाठी त्यांनी सलग बैठका आणि प्रत्यक्ष पाहणीचा धडाका लावला आहे. ३० आणि ३१ जुलै या कालावधीत सुरू असलेल्या या दौऱ्यात जिल्हा नियोजन समितीसह विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला जात असून, नागरिकांच्या प्रश्नांवरही त्या स्वतः लक्ष केंद्रित करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे ३० जुलै रोजी सायंकाळी सुनेत्रा पवार यांनी परळी रेल्वे प्रकल्पाचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या विकासकामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याशिवाय जिल्हा क्रीडा संकुल समिती आणि नगरपरिषदांच्या विविध प्रकल्पांचाही त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
दिवसभराच्या बैठका पूर्ण झाल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत त्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधत नागरिकांच्या अडचणी आणि स्थानिक प्रश्नांची माहिती घेतली. विशेष म्हणजे, अल्प विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळी सात वाजताच त्या जिल्हा रुग्णालय परिसरात दाखल झाल्या. त्यांच्या या कार्यपद्धतीची तुलना दिवंगत अजित पवार यांच्या कामाच्या शैलीशी केली जात असून, विकासकामांबाबत त्याच तळमळीने पुढे जात असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बीडच्या विकासकामांचा वेग कमी होणार नाही, असे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी यापूर्वी बीडकरांना दिले होते. त्यामुळे सुरू असलेल्या प्रकल्पांचे भवितव्य आणि विकासाचा प्रवास कायम राहणार का, अशी निर्माण झालेली चिंता या दौऱ्यातील त्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे काही प्रमाणात दूर झाल्याचे बोलले जात आहे. विकासकामांबाबतची कृतीशील भूमिका आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे नागरिकांमध्ये नव्याने विश्वास निर्माण झाल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, बीड दौऱ्यावर असतानाच अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीकडेही सुनेत्रा पवार यांनी लक्ष दिले. अनेक भागांतील नद्या आणि नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी नागरिकांपर्यंत तातडीने मदत पोहोचविण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे तसेच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने अत्यंत सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.