चिखली तालुक्यातील शेलगाव जहांगीर येथे शेतजमिनीच्या वादातून बौद्ध समाजातील महिलेवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.
चिखली : चिखली तालुक्यातील शेलगाव जहांगीर येथे शेतजमिनीच्या वादातून बौद्ध समाजातील महिलेवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे नेते दीपक केदार यांनी पीडित महिलेची रुग्णालयात भेट घेऊन आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी करत शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनीही रुग्णालयात भेट देत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली असून, आरोपीचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेचे नेते दीपक केदार यांनी ३ जुलै रोजी चिखली येथे येऊन चिंचोले हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पीडित सौ. उषाबाई साळवे व कु. प्रतीक्षा साळवे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली. आरोपी स्वतःला शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून सांगत असल्याचा आरोप करत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावरही टीका केली होती.
दरम्यान, शुक्रवारी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख विलास घोलप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने चिंचोले हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित मायलेकीची भेट घेतली. यावेळी त्यांनी खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार श्वेता महाले-पाटील आणि शिवसेना पीडितांच्या पाठीशी असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चिखली पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांची भेट घेत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
माध्यमांशी बोलताना विलास घोलप यांनी स्पष्ट केले की, "शिवाजी किसन शिराळे हा शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी नसून त्याच्याकडे पक्षाची कोणतीही अधिकृत जबाबदारी नाही. त्यामुळे त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नाही आणि शिवसेना त्याला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालणार नाही." तसेच प्रतापराव जाधव व आमदार श्वेता महाले-पाटील यांच्यावरील आरोप निराधार असल्याचेही त्यांनी सांगितले.
घोलप यांनी पीडित महिलांना संपूर्ण पाठिंबा देत, त्यांना पुन्हा धमकावण्याचा किंवा त्यांच्या शेतीत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा इशाराही दिला.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.