Lt. Atharva Ghan: लेफ्टनंट अथर्व घन यांनी सैन्य दलातील यशस्वी जीवनाचा आढावा घेतला, यशाच्या मागील जिद्द आणि प्रयत्नांची माहिती दिली.
Lt. Atharva Ghan |
लेफ्टनंट अथर्व घन यांचा तरुणाईला संदेश
हिंगोली (Lt. Atharva Ghan) : आपण आपले ध्येय निश्चित करून ते गाठण्याची जिद्द बाळगली तर यश हमखास प्राप्त होते, असा संदेश थलसेनेत लेफ्टनंट या पदावर नियुक्ती मिळालेल्या अथर्व घन या युवकाने देशोन्नतीच्या माध्यमातून दिला. प्रशिक्षण पूर्ण करून सैन्य दलात रुजू होण्यापूर्वी हिंगोली या आपल्या जन्म गावी आले असता देशोन्नतीने त्यांच्याशी संवाद साधला.
लेफ्टनंट अथर्व घन (Lt. Atharva Ghan) यांचे वडील मुकुंद व आई राधिका घन हे दोघे शिक्षक. आजी आजोबा सरोजिनी व लक्ष्मीकांत घन हे सुद्धा जुन्या काळातील शिक्षक. संरक्षण दलात कुटुंबातील कोणीही जवळचा नातेवाईक नसताना अथर्व घन यांनी हे क्षेत्र का निवडले, यावर बोलताना ते म्हणाले की प्रारंभी पासून सैनिकी वेशभूषा, हत्यार बाळगणे, धाडसी कामे अशा गोष्टींची त्यांना आवड होती. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एनसीसी नसल्याने शाळा सोडून सेमी इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्याचा निर्णय त्यांनी आठव्या वर्गात स्वत: घेतला. अकरावी बारावी दरम्यान नीट च्या तयारीसाठी अकोला येथे प्रवेश घेतला पण या शिक्षणात आपले मन लागत नसल्याचे त्यांना स्वतःला जाणवले.
पुढे विज्ञानाच्या पदवीसाठी पुण्यातील एका महाविद्यालयात प्रवेश घेऊन एनसीसीच्या ओपन युनिटमध्ये सुद्धा त्यांनी प्रवेश घेतला. एनसीसीच्या माध्यमातून सैनिकी जीवन अगदी जवळून पाहता आले आणि सेनादलात काम करण्याची आपली जीजिविषा अधिक बळावली, असे ते म्हणाले. सशस्त्र सेनादलात काम करण्याची संधी मिळावी म्हणून 'सर्विसेस सिलेक्शन बोर्ड' च्या तीन परीक्षांमध्ये सलग अनुत्तीर्ण होऊनही लेफ्टनंट अथर्व यांनी जिद्द सोडली नाही. शेवटी चौथ्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. या परीक्षेत त्यांचा देशात ३४ वा क्रमांक आला. यानंतर सुरू झालेले प्रशिक्षण अत्यंत खडतर होते, असे सांगून त्यांनी या प्रशिक्षण काळातील त्रास ज्याला झेलता आला त्याला आयुष्यात कोणतीही अडचण मोठी वाटणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय सेना दल अन्य देशांपेक्षा कसे श्रेष्ठ आहे यावर बोलताना लेफ्टनंट अथर्व म्हणतात, एखाद्या कठीण प्रसंगाला सामोरे जात असताना अन्य देशात दलाचा प्रमुख मागे राहतो; तो आपल्या सैनिकांना पुढे करत असतो परंतु भारतीय सेनादलात प्रमुख सामोरे जात असतो, सैनिकांना मागे ठेवतो. म्हणून भारतीय सेनादलासारखी नैतिकता अन्य कोणत्याही सेनादलात नसल्याचा अभिमानही लेफ्टनंट अथर्व यांनी बोलून दाखविला.
संरक्षण दलात करिअर करावयाचे असल्यास पाचव्या वर्गापासून तयारी करता येते, अशी माहिती लेफ्टनंट अथर्व घन यांनी दिली. यासाठी देशात आर. आय. सी. अर्थात राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज ही एकमेव शासकीय संस्था देहरादून येथे आहे. शिवाय देशात सैनिकी शिक्षण देणार्या अनेक खाजगी शाळा व महाविद्यालये आहेत. अशी माहिती त्यांनी दिली. वैद्यकीय, अभियांत्रिकी, वाणिज्य, कायदेशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत काम करून चरितार्थ चालविता येतो; परंतु देश आणि समाजाची सेवा करण्याची आवड असल्यास संरक्षण दलातच जायला हवे, अशी आग्रही सूचनाही त्यांनी तरुणांसाठी केली.
सेनादलासाठी तयारी करीत असताना लेफ्टनंट अथर्व (Lt. Atharva Ghan) यांनी आपले छंदही जोपासले आहेत. ते शास्त्रीय संगीताच्या पहिल्या पाच परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यांना गायकीचा छंद आहे, शिवाय ते बास्केटबॉल चे उत्तम खेळाडू आहेत. बाजीप्रभू देशपांडें वरील ‘पावनखिंड’ व सावरकरांचे 'काळे पाणी' ही त्यांची आवडती पुस्तके आहेत. शाळेत आपल्याला कधीही ९०-९५ टक्के गुण मिळाले नाहीत, परंतु शाळा महाविद्यालयीन जीवनाचा आपण पूर्ण आनंद घेतल्याचा समाधान त्यांनी व्यक्त केला. वाचन, फिटनेस, खेळ आणि एखादे कौशल्य विद्यार्थी दशेत सर्वांनीच जोपासायला हवे, असे मत ते व्यक्त करतात.
शासनाकडून अपेक्षा
देशातील काही राज्यांत संरक्षण दलात प्रवेशाची परीक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो.शासन स्तरावर त्यांचा गौरव करून त्यांना एक निश्चित रक्कम दिली जाते. ज्या कुटुंबाने आपला मुलगा देशासाठी दिला आहे त्या कुटुंबाचे गौरव सरकारने करायला हवे अशी अपेक्षा लेफ्टनंट अथर्व मुकुंद घन यांनी देशोन्नतीशी बोलताना व्यक्त केली.