राज्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
देवयानी पारधी यांचा व्हिडिओ व्हायरल; निकृष्ट दर्जाच्या कच्च्या मालामुळे बालपोषणावर परिणाम होत असल्याचा आरोप
मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत पोषण आहारासाठी मिळणाऱ्या कच्च्या मालाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
देवयानी पारधी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये अंगणवाड्यांना प्रशासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या साहित्याबाबत अनेक मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, भरडा, साखर, पांढरे वाटाणे, मूगडाळ, तांदूळ, हळद आणि खाद्यतेल यांसारखा कच्चा माल अंगणवाड्यांना पुरविला जातो. मात्र, त्यातील पांढरा वाटाणा दर्जाहीन असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
त्यांनी सांगितले की, पांढरा वाटाणा एक दिवस आधी पाण्यात भिजवून ठेवला आणि कुकरमध्ये 9 ते 10 शिट्या दिल्यानंतरही तो पूर्णपणे शिजत नाही. शिजवल्यानंतरही तो कडक आणि कच्चाच राहतो. अशा अवस्थेतील अन्न लहान मुलांना देताना मनाला वाईट वाटते, मात्र उपलब्ध साहित्यामुळे दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी नमूद केले.
लापशी तयार करण्यासाठी मिळणाऱ्या भरड्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भरडा कितीही वेळ शिजवला तरी तो पूर्णपणे मऊ होत नाही. तसेच प्रशासनाकडून 1 किलो भरड्यासाठी केवळ पाव किलो साखर दिली जात असल्याने लापशीला अपेक्षित गोडवा राहत नाही. त्यामुळे अंगणवाडीत उत्साहाने येणाऱ्या लहान मुलांचा हिरमोड होत असल्याचे त्यांनी सांगितले.
देवयानी पारधी यांनी मुलांच्या आरोग्याचाही मुद्दा उपस्थित केला आहे. "आम्ही या चिमुकल्यांची स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेतो. मात्र निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे त्यांचे वजन वाढण्याऐवजी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अशा आहाराचा नेमका उपयोग काय?" असा प्रश्न त्यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला आहे.
या प्रकरणी त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना थेट आवाहन करत निकृष्ट दर्जाच्या पोषण आहारावर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे. हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत हा मुद्दा पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी केले असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.