देशातील प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक घटना घडली आहे.
ASIच्या स्वच्छता मोहिमेदरम्यान ६० फूट खोल अमृतकुंडातील शिवलिंग प्रथमच स्पष्ट; भाविक आणि मंदिर प्रशासनात
नाशिक (Ancient Shivling) : देशातील प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक घटना घडली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाने अमृतकुंडातील पाणी बाहेर काढून स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर कुंडाच्या तळाशी असलेले प्राचीन शिवलिंग स्पष्टपणे दिसून आले. अनेक वर्षांनंतर घडलेल्या या दर्शनामुळे भाविकांमध्ये तसेच मंदिर प्रशासनात मोठा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या मार्गदर्शनाखाली अमृतकुंडाची साफसफाई करण्यात आली. यासाठी कुंडातील संपूर्ण पाणी बाहेर काढण्यात आले. पाणी पूर्णपणे कमी झाल्यानंतर तळाशी असलेले शिवलिंग प्रथमच स्पष्ट स्वरूपात पाहायला मिळाले. या दुर्मिळ घटनेने उपस्थित अधिकारी आणि मंदिर प्रशासनाचे विशेष लक्ष वेधून घेतले.
६० फूट खोल अमृतकुंडाचे धार्मिक महत्त्व
सुमारे ६० फूट खोल असलेले अमृतकुंड पेशवेकालीन असल्याचे मानले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून या कुंडाला विशेष महत्त्व आहे. कारण श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या नियमित पूजा आणि अभिषेकासाठी याच अमृतकुंडातील पवित्र पाण्याचा वापर केला जातो.
भाविकांना प्रवेशास मनाई
सुरक्षेच्या कारणास्तव सामान्य भाविकांना अमृतकुंडात प्रवेश करण्यास परवानगी नाही. हे कुंड अत्यंत सुरक्षित ठेवण्यात आले असून त्याचे संरक्षण करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक वर्षांनंतर झालेल्या या अलौकिक दर्शनामुळे मंदिर परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास
'त्र्यंबक' या शब्दाचा अर्थ ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांशी संबंधित असा होतो. नाशिक शहरापासून सुमारे २८ किलोमीटर अंतरावर असलेले त्र्यंबकेश्वर हे भगवान शंकराचे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते.
मंदिराच्या परिसरात ब्रह्मगिरी पर्वत असून याच पर्वताला पवित्र गंगा नदीचे उगमस्थान मानले जाते. येथे कुशावर्त कुंड हे पवित्र तीर्थक्षेत्रही आहे. या कुंडाची निर्मिती श्रीमंत सरदार रावसाहेब पार्नेकर यांनी केली होती. सध्या अस्तित्वात असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर श्रीमंत नानासाहेब पेशवा यांनी इ.स. १७५५ ते १७८६ या कालावधीत बांधले असून ते ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे.