अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे दोन जिवलग मित्रांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत वलगावचे सरपंच सुधीर उगले यांच्यासह सात आरोपींना अटक केली आहे.
अमरावती दुहेरी हत्याकांडात मोठी कारवाई; पाच मुख्य आरोपींसह सरपंच सुधीर उगले यांनाही अटक
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे दोन जिवलग मित्रांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत वलगावचे सरपंच सुधीर उगले यांच्यासह सात आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील पाच मुख्य आरोपींसह सरपंचालाही बेड्या ठोकण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सर्व आरोपींना आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील वलगाव बसस्थानक परिसरात मध्यरात्री दोन तरुणांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात संजोग जोशी (वय २४) आणि ऋतिक पंडित (वय २५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तपासादरम्यान, कबूतर चोरल्याच्या वादातून हा दुहेरी खून झाल्याचे समोर आले आहे. जुन्या आणि किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले आणि त्यातून दोन्ही तरुणांचा जीव गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पाच हल्लेखोरांनी वलगाव बसस्थानक परिसरात दोन्ही मित्रांवर अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. धारदार शस्त्राने सपासप वार केल्यामुळे संजोग जोशी आणि ऋतिक पंडित यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या प्रकरणातील पाचही मुख्य आरोपी हे सुमारे २५ वर्षे वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान या गुन्ह्यात वलगावचे सरपंच सुधीर उगले यांचा सहभाग आढळून आल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास वलगाव पोलीस करत असून सर्व आरोपींना आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.