हिंगोली (Akrosh Andolan) : शेतकरी कर्जमाफी, नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण, शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किंमती तसेच वाढती महागाई यांसह विविध जनहिताच्या मागण्यांसाठी काल दि. ९ ला गांधी चौक, हिंगोली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनास शिवसेना उपनेते तथा हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मा. आ. संतोष टारफे, जिल्हाप्रमुख अजय गोपु पाटील सावंत, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, सहसंपर्क प्रमुख विनायकराव भिसे, सहसंपर्क प्रमुख (वसमत विधानसभा) सुनिल काळे, जिल्हासंघटक बाळासाहेब मगर, शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख, मराठवाडा पदवीधर समन्वयक दिलीप घुगे, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख पराग अडकीने, उपजिल्हाप्रमुख गणेशराव शिंदे, उपजिल्हाप्रमुख अनिल कदम, उपजिल्हाप्रमुख (प्रशासकीय) उध्दवराव गायकवाड, कळमनुरी विधानसभा प्रमुख चंद्रकांत देशमुख, हिंगोली विधानसभा प्रमुख परमेश्वर मांडगे, उपजिल्हा संघटक सोपान पाटील, उपजिल्हा संघटक शंकरराव घुगे, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, भानुदास जाधव, आनंदराव जगताप, अनिल शिंदे, डॉ. पार्डीकर, माऊली झट्टे, संतोष देवकर, अल्पसंख्याक आघाडीचे अलीम खतीब, हिंगोली शहरप्रमुख रवी अण्णा पुपालू, औंढा शहरप्रमुख संजय भामिरगे, शहर संघटक चंदू उबाळे यांच्यासह सर्व उपतालुकाप्रमुख, सर्कलप्रमुख, शिवसैनिक, युवासैनिक, शेतकरी, कामगार, महिला पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख अजय (गोपु) पाटील सावंत यांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न प्रलंबित असून महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच, नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आला असून शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी धोक्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थितांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. तसेच, शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील शासनाच्या जीआरची प्रत जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.