वसमत ते पूर्णा कारखाना रस्त्यावरील जवळा-खंदारबन शिवारातील एका शेतावर वसमत ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून क्रूरपणे बांधून ठेवलेली १९ जनावरे जप्त केली.
वसमत : वसमत ते पूर्णा कारखाना रस्त्यावरील जवळा-खंदारबन शिवारातील एका शेतावर वसमत ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून क्रूरपणे बांधून ठेवलेली १९ जनावरे जप्त केली. सर्व जनावरांची मुक्तता करून त्यांना सुरक्षितपणे गोशाळेत पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी शेतमालक तथा वसमत नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, कत्तलीच्या उद्देशाने अंदाजे ₹१.६३ लाख किमतीची १९ जनावरे जमवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
वसमत ग्रामीण पोलिसांना २९ जुलैच्या रात्री गुप्त बातमीदारामार्फत खंदारबन शिवारातील एका शेतात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात जनावरे आणल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे व त्यांच्या पथकाने जवळा-खंदारबन शिवारातील गट क्रमांक ३२ मधील शेतावर छापा टाकला.
छाप्यामध्ये शेतात चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता लहान-मोठी एकूण १९ जनावरे क्रूरपणे बांधून ठेवलेली आढळून आली. या जनावरांची अंदाजे किंमत ₹१.६३ लाख असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आरिफ बशीर दोसानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमान्वये सय्यद इम्रान अली यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सय्यद इम्रान अली हे वसमत नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष असून, जनावरे सापडलेले शेत त्यांच्या मालकीचे असल्याने या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ही जनावरे नेमकी कोणत्या उद्देशाने शेतात आणून बांधण्यात आली होती, याचा पोलीस तपास करत आहेत.
उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली यांची भूमिका
या संदर्भात उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदर शेत त्यांच्या पत्नीच्या नावावर असून ते दुसऱ्या व्यक्तीस बटाईने दिले आहे. शेताचा सर्व व्यवहार संबंधित व्यक्तीच पाहत असून ते केवळ शेतमालक आहेत. जनावरे कशासाठी आणण्यात आली होती, याची माहिती संबंधित व्यक्तीलाच आहे. या प्रकरणात काही गैर आढळल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. माझा या प्रकरणाशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही. मी कधीही अशा समाजविघातक कामात सहभागी झालो नाही. पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तपासात मी दोषी आढळल्यास माझ्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी 'देशोन्नती'शी बोलताना दिली.